
अंबरनाथमध्ये उपचारादरम्यान एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता या घटनेत मोठा ट्विस्ट आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप झालेल्या डॉ. स्वप्नाली गायकर यांनी शुक्रवारी रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. काही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या मानसिक छळामुळे आणि सोशल मीडियावरील बदनामीमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप डॉक्टर गायकर यांनी केला आहे. सध्या त्यांच्यावर उल्हासनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मी नगर भागात राहणाऱ्या विजय विनोद जयस्वाल या ६ वर्षीय मुलाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत होता. डॉ. स्वप्नाली गायकर या त्याच्यावर उपचार करत होत्या. ७ फेब्रुवारी रोजी उपचारांदरम्यान त्या मुलाला सलाईन लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. त्याला तातडीने सायन रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र दुर्दैवाने तिथे त्याचा मृत्यू झाला. यानंतर मुलाच्या पालकांनी डॉ. गायकर यांच्यावर चुकीच्या उपचारांचा आणि हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला.
डॉ. स्वप्नाली गायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवाल (PM Report) येणे अद्याप बाकी आहे. असे असतानाही प्रवीण गोसावी, संदीप भरड, वैशाली नलावडे आणि मिलिंद मगर या सामाजिक कार्यकर्त्यांनी कोणतीही अधिकृत तक्रार नसताना त्यांना टार्गेट केले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून आणि सातत्याने मानसिक दडपण आणून बदनामी केल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. याप्रकरणी कायदेशीर मार्गाने तपास व्हावा, पण अशा प्रकारे विनाकारण बदनामी करून मला आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे, असे डॉ. स्वप्नाली गायकर यांनी म्हटले.
तर दुसरीकडे, ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवर आरोप झाले आहेत, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असून आपल्या चुकीच्या कामावर पडदा टाकण्यासाठी डॉक्टर ड्रामा करत आहेत, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. या मुलाच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असून आमची कायदेशीर लढाई सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
या सर्व प्रकरणाची अंबरनाथ पोलीस चौकशी करत आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि शहरात मोठी खळबळ उडाली आहे.