नागपूरहून लग्नासाठी निघाले, वऱ्हाड पोहोचण्यापूर्वीच…; एकाच कुटुंबातील 3 जणांचा अंत
अमरावती जिल्ह्यातील वरूड-मोर्शी महामार्गावर खडका फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून, झाडाला धडक बसल्याने नांदे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यात ३ वर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे.

अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर आज एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. खडका फाट्याजवळ झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदे कुटुंब नागपूर येथून एका लग्न समारंभासाठी निघाले होते. वरूड ते मोर्शी महामार्गावरून प्रवास करत असताना खडका फाट्याजवळ त्यांच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर ते भरधाव वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन जोरात धडकले. ही धडक इतकी भीषण होती की वाहनाचा दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या दुर्दैवी अपघातात नांदे कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. समाधान नांदे, किरण नांदे आणि दिया नांदे (३ वर्ष) अशी या तिघांची नावे आहेत. या अपघातात गोपाल नांदे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या भीषण धडकेतून ते बचावले असले तरी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
परिसरात शोककळा
लग्नकार्यासाठी निघालेल्या कुटुंबावर वाटेतच काळाने झडप घातल्याने नांदे कुटुंब पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. एका तीन वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाल्याने उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघातांचे भीषण सत्र
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारी अपघातांचे भीषण सत्र पाहायला मिळाले. वैजापूर, करमाड आणि बिडकीन परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. वैजापूरच्या बाभूळगाव येथील सलमान शेख (३३) यांचा नांदगावजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला, तर करमाड येथील लहुकी फाट्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जगन्नाथ दांडगे (३६) या दुचाकीस्वाराला प्राण गमवावे लागले. तिसरी घटना बिडकीन-पैठण महामार्गावर घडली, जिथे भरधाव रिक्षा उलटल्याने छाया कोथिंबिरे या महिलेचा अंत झाला. या सर्व घटनांमधील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, एकाच दिवशी ओढवलेल्या या मृत्यूच्या तांडवामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.