अमृता फडणवीस यांचा पहिल्यांदाच सुषमा अंधारे यांना फोन, नेमकी चर्चा काय?

सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेनंतर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी सुषमा अंधारे यांना फोन करुन विचारपूस केली आहे. विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनीदेखील सुषमा अंधारे यांना फोन करुन विचारपूस केल्याची माहिती स्वत: अंधारे यांनी दिली आहे.

अमृता फडणवीस यांचा पहिल्यांदाच सुषमा अंधारे यांना फोन, नेमकी चर्चा काय?
सुषमा अंधारे आणि अमृता फडणवीस यांचा फोटो
| Edited By: Chetan Patil | Updated on: May 03, 2024 | 10:06 PM

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर आज महाडमध्ये कोसळलं. सुदैवाने या हेलिकॉप्टरमध्ये सुषमा अंधारे बसल्या नव्हत्या. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुषमा अंधारे सध्या राज्यातील वेगवेगळ्या भागात प्रचारासाठी जात आहेत. सुषमा अंधारे यांची काल महाडमध्ये सभा पार पडली. त्यानंतर त्या आज बारामतीला सभेसाठी जाणार होत्या. यासाठी त्यांना घेण्यासाठी आज सकाळी महाड येथे हेलिकॉप्टर आलं होतं. पण हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं. या घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्याला अनेकांनी फोन केल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा सुषमा अंधारे यांना फोन करुन विचारपूस केल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.

“खरंच आम्ही आज वाचलो आहोत. ते हेलिकॉप्टर पाहून मला असं वाटलं की आतील पायलट यांचं काय? पण सुदैवाने तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असल्यामुळे पायलेट देखील सुखरूप वाचले आहेत”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील आज माझी विचारपूस केली आहे. विरोधी पक्षाचे असले तरी पाहून चांगलं वाटलं. त्याचबरोबर भाजप नेते प्रवीण दरेकर, शिवसेनेचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मला फोन केला होता आणि माझी विचारपूस केलीय”, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.

अपघात कसा झाला?

“हेलिपॅडवरती पाणी मारले गेले की नाही, तसेच सध्या प्रशासकीय कारभार आहे, त्यांनी लक्ष देणे गरजेचं होतं”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली. या दरम्यान, शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. “माझ्या बहिणीने मला फोन केला असता तर मी मदत केली असती”, असं भरत गोगावले म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याबाबत सुषमा अंधारे यांना विचारलं असता, “ते महाडमध्ये राहतात. ते भेटायला का नाही आले? आणि काल आमच्या एका कार्यकर्त्यावर त्यांच्याच मुलांनी हल्ला केला”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

‘जे गळतीला लागले होते ते गळाले’

काँग्रेसमध्ये निलंबित झालेले नेते संजय निरुपम यांनी आज अखेर शिवसेनेत प्रवेश केलाय. याबाबत सुषमा अंधारे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी “जे गळतीला लागले होते ते गळाले”, अशी टीका केली. यावेळी सुषमा अंधारे यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी प्रत्युत्तर दिलं. “काय-काय घाईने उत्तर देतात. फ्रस्टेशनमध्ये असतात. मीडियामध्ये खूप दिवस दिसले नसतात त्यासाठी हे सर्व करतात”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

Follow Us