नीट पेपरफुटीप्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

नीट पेपरफुटीप्रकरणी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या आंदोलनावर आता अमृता फडवणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या, ते जाणून घ्या..

नीट पेपरफुटीप्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
अमृता फडणवीस
Image Credit source: Tv9
| Updated on: Jul 25, 2026 | 10:37 AM

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) ठाम आहे. प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थी आंदोलक जंतर-मंतरवरून हटणार नाहीत, अशी अट सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारला घातली आहे. त्यामुळे शुक्रवारी केंद्रीय मंत्री जेपी नड्डी, जितेंद्र सिंह यांच्यासोबत सीजेपीच्या प्रतिनिधींची झालेल्या चर्चेतून काही तोडगाच निघाला नाही. तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने 24 तासांची मुदत मागितली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी सरकार घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

“आंदोलन जोपर्यंत नीट पेपरफुटीबद्दल आहे, तोपर्यंत ते योग्य आहे. त्याबद्दल आधीपासूनच सरकार बॅकस्टेज काम करतंय. पेपरफुटीच्या दोषींवर ते कारवाई करत आहेत. सोबत ते विविध बदलसुद्धा आणत आहेत. विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी सरकार घेत आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान दिल्लीतल्या विठ्ठलभाई पटेल हाऊसमध्ये शुक्रवारी सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी जवळपास दोन तास चर्चा केली. सीजेपच्या तीन मागण्यांपैकी पहिल्या दोन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती त्यांनी बैठकीनंतर दिली. आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणं आणि नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देणं, या दोन पहिल्या मागण्या होत्या. तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबद्दल केंद्र सरकारने वेळ मागून घेतली आहे. वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून आमचा निर्णय शनिवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत कळवू असं नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी दिली. त्यामुळे आज दुपारी केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us