जवानाच्या जिद्दीला सलामच! संपूर्ण गावाच्या डोळ्यातून अश्रू वाहताय, बायकोसह मुलांना वाचवलं पण स्वतःला…

| Updated on: Mar 10, 2023 | 5:03 PM

नाशिकच्या सिन्नर येथे दुर्दैवी घटना घडली असून संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरली आहे. भारतीय सैन्य दलातील जवान गणेश गीते पाण्यात वाहून गेला आहे.

जवानाच्या जिद्दीला सलामच! संपूर्ण गावाच्या डोळ्यातून अश्रू वाहताय, बायकोसह मुलांना वाचवलं पण स्वतःला...
Image Credit source: Google
Follow us on

उमेश पारिक, टीव्ही 9 मराठी, सिन्नर ( नाशिक ) : नाशिकमध्ये एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. सुट्टीवर आलेले सिन्नर येथील जवान गोदावरी नदीच्या ( Godavari River )  उजव्या कालव्यात वाहून गेले आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील चोंडी येथील ही घटना आहे. गणेश सुखदेव गीते ( army man Ganesh Gite ) असे त्यांचे नाव आहे. शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन घरी परतत असतांना ही दुर्दैवी घटना घडली आहे. सहा वर्षाच्या मुलीचा मोटरसायकलच्या हँडल मध्ये पाय अडकल्याने गाडीचा तोल गेला होता. तोल गेल्याने गोदावरीच्या उजव्या कालव्यात पडले होते. पत्नी रूपाली सह सहा वर्षाची मुलगी दीड वर्षाच्या मुलाला वाचवण्यात त्यांना यश आले, मात्र दम लागल्याने स्वतःला ते वाचू न शकल्याने पाण्यात वाहून गेले आहेत.

गोदावरीच्या उजव्या कालव्याला सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. जवळपास पंधरा तास उलटून गेले तरी अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे शोधकार्य सुरू आहे.

गणेश सुखदेव गीते हे सुट्टीवर आलेले होते. आपल्या कुटुंबाला घेऊन ते शिर्डीला गेले होते. देवदर्शन झाल्यावर त्यांनी घराची वाट धरली होती. दुचाकीवरून येत असतांना गोदावारीचा उजवा कालवा लागतो. त्याच वेळी दुचाकी वर पढे बसलेल्या मुलीचा पाय हँडलमध्ये अडकला.

हे सुद्धा वाचा

दुचाकीसह सर्वांचाच तोल गेला. आणि थेट कालव्यातच पडले. जवान गणेश गीते यांनी लागलीच आपल्या दोन्ही मुलांना पकडलं. आणि कालव्याच्या बाहेर काढलं. सोबत पत्नीही कालव्यात पडली होती त्यांना बाहेर काढलं पण त्याचवेळी त्यांचा श्वास कोंडला आणि ते वाहून गेले.

पत्नीसह मुलांच्या डोळ्यासमोर जवान गणेश गीते हे वाहून गेले. त्यांनी आरडा ओरड केला पण मदत झाली नाही. काही क्षणात जवान गणेश गीते नाहीसे झाले. रात्रीपासून शोधकार्य सुरू असून अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही.

खरं तर उजव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा वेगही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गणेश यांचा शोध लागत नाहीये. ही संपूर्ण घटना सिन्नरसह परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली असून तालुक्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

संपूर्ण जिल्ह्यात जवानाने अखेरच्या क्षणापर्यन्त दाखवलेली जिद्द अनेकांच्या मनात घर करून राहिली आहे. अनेकांच्या डोळ्यात अश्रू असून जवान सुखरूप असावा अशी प्रार्थना केली जात आहे. मात्र, पाण्याचा वेग पाहता जवानाचा शोध न लागल्याने संपूर्ण गाव आस लावून बसलेले आहे.