दोघांची नार्को टेस्ट करु या…परमबीर सिंह यांचे अनिल देशमुख यांना चॅलेंज

anil deshmukh parambir singh: मी सत्य माहिती दिली नाही तर माझ्यावर कारवाई का केली नाही? अनिल देशमुख यांनी जे आरोप केले आहेत, त्यासंदर्भात त्यांनी त्यावेळी माझी चौकशी का केली नाही? माझ्यावर कारवाई का केली नाही? माझी तीन वेळा एनआयएकडे चौकशी झाली. त्या चौकशीत काहीच आढळले नाही.

दोघांची नार्को टेस्ट करु या...परमबीर सिंह यांचे अनिल देशमुख यांना चॅलेंज
परमबीर सिंह, अनिल देशमुख
Jitendra Zavar | Updated on: Aug 05, 2024 | 3:39 PM

माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख चर्चेत आले होते. आता चार दिवसांपासून अनिल देशमुख पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंह यांच्यावर आरोप केले आहेत. मनसुख हिरेन यांच्या खून प्रकरणात परमबीर सिंह यांना अटक होणार होती. त्यामुळे ते फडणवीस यांना शरण गेले आणि माझ्यावर आरोप केले, असे अनिल देशमुख यांनी म्हटले. त्याला आता परमबीर सिंह यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना उत्तर दिले.

 

शरद पवार, जयंत पाटील यांनाही सांगितले होते…

सचिन वाझे दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते की, अनिल देशमुख यांनी सांगितल्यानंतर ते वसुली करत होते. कुंदन शिंदे मार्फत अनिल देशमुख यांच्यापर्यंत पैसे पोहचवले जात होते. त्या आरोपावर बोलताना परमबीर सिंह म्हणाले की, सचिन वाझे आणि इतर अधिकाऱ्यांनी मला हा सर्व प्रकार सांगितला होता. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना पत्र लिहिले. हे पत्र लिहिण्यापूर्वी मी मुख्यमंत्री, शरद पवार, जयंत पाटील यांच्या कानावर हा सर्व प्रकार टाकला होता. त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे पत्र लिहिले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रकरणाची चौकशी झाली. त्या चौकशीत अनिल देशमुख दोषी आढळले. त्यानंतर ते कारागृहात गेले.

दोघांची नार्के टेस्ट करु या…

मनसुख हिरेन हत्या प्रकरण असो की अंबानी यांच्या अँटलिया निवासस्थानाबाहेर बॉम्ब ठेवल्याचे प्रकरण असो, त्यातील सत्य तुम्ही लपवले, सांगितले नाही. तुम्हाला बोलवल्यानंतर माहिती दिली नाही, असा आरोप अनिल देशमुख करत आहेत. त्यावर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख आणि माझी दोघांची नार्को चाचणी करावी, सर्व सत्य समोर येईल, असे आव्हान दिले.

ते पुढे म्हणाले, मी सत्य माहिती दिली नाही तर माझ्यावर कारवाई का केली नाही? अनिल देशमुख यांनी जे आरोप केले आहेत, त्यासंदर्भात त्यांनी त्यावेळी माझी चौकशी का केली नाही? माझ्यावर कारवाई का केली नाही? माझी तीन वेळा एनआयएकडे चौकशी झाली. त्या चौकशीत काहीच आढळले नाही. त्यामुळे आता आपण दोघे नार्के टेस्ट करु या, असे परमबीर सिंह यांनी म्हटले आहे. सचिन वाझे पुन्हा पोलीस दलात अनिल देशमुख यांच्या आदेशानंतरच आले होते, असे त्यांनी सांगितले.

ही ही वाचा…

अनिल देशमुखांचा पुत्र माझा पाया पडत होता, माफी मागत होता, चूक झाल्याचे सांगत होता… माजी IAS परमबीर सिंह यांचा सर्वात मोठा दावा

Follow Us