…तर पुन्हा जंतर मंतर, प्रधान यांच्या राजीनाम्यामंतर CJP चा नव्या शिक्षण मंत्र्यांना इशारा काय?
Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आहे. असं असलं तरी CJP ने पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आहे. आता CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी पार्टीच्या आगामी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. आता CJP संपूर्ण देशभरात जाऊन इतर मुद्देही उपस्थित करणार आहे. रांका यांना म्हटले की, CJP हे तरुणांसाठी तयार करण्यात आलेले व्यासपीठ आहे. त्यामुळे आता इतर महत्त्वाचे प्रश्नही या माध्यमातून मांडले जातील. या देशातील तरुण जागे झाले आहेत. त्यांनी आपल्या हक्कांसाठी लढा दिला आहे. त्यांनी योग्य गोष्टीसाठी संघर्ष केला आहे. आज अखेर आमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत.’
पुढे बोलताना आशुतोष रांका यांनी सांगितले की, नीट पेपरफुटीनंतर आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलेल्या सर्व कुटुंबांचा आम्ही विचार करत आहोत. पेपरफुटीमुळे ज्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे, अशा लाखो-कोट्यवधी विद्यार्थ्यांचाही आम्ही विचार करत आहोत. आज काही प्रमाणात न्याय मिळाला आहे. पुढे जो कोणी शिक्षणमंत्री बनेल, त्यांनी प्रामाणिकपणे आणि उत्तरदायित्वाने आपले काम करावे, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे आम्ही शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, त्याचप्रमाणे आता संपूर्ण देशभरात जाऊन इतर प्रश्नही मांडू. या देशातील तरुणांसाठी जे काही करावे लागेल, ते आम्ही करू.
… तर पुन्हा जंतर-मंतरवर येऊ
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सांगितले की, ‘तरुणांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदावर येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला इशारा दिला आहे की, त्यांच्या समस्या सोडवल्या गेल्या नाही तर ते पुन्हा जंतर-मंतरवर येतील आणि सरकारला याचा जाब विचारलीत.’ CJP च्या या इशाऱ्यामुळे आता शिक्षण खात्याला सतर्क राहून काम करावे लागणार आहे.
प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. आला आहे. त्यांच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयासोबतच त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारण्यात आला असून प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
