VIDEO: तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिली नाही, अण्णा हजारेंचे हताश उद्गार; प्राणांतिक उपोषणाचा निर्णय पुढे ढकलला

| Updated on: Feb 13, 2022 | 4:07 PM

राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कडाडून टीका केली आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात. मालक नाही. त्यामुळे तुम्ही जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही मनमानी कशी करू शकता?

VIDEO: तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिली नाही, अण्णा हजारेंचे हताश उद्गार; प्राणांतिक उपोषणाचा निर्णय पुढे ढकलला
Anna Hazare
Follow us on

राळेगणसिद्धी: राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा (wine sale in supermarkets) निर्णय घेतला आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी कडाडून टीका केली आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात. मालक नाही. त्यामुळे तुम्ही जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही मनमानी कशी करू शकता?, असा सवाल करतानाच वाईनही आपली संस्कृती नाही. आपल्या राज्यात दारुची दुकानं कमी आहेत का? तरीही किराणा आणि सुपरमार्केटमध्ये वाईन का ठेवता? तुम्हाला तरुण पिढीला व्यसनाधीन करायचं आहे का? तुमच्या या निर्णयाने मी दु:खी झालो आहे. त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही, असे हताश उद्गार अण्णा हजारे यांनी काढलं आहे. तसेच उद्यापासून होणारे अमरण उपोषण (hunger strike) पुढे ढकलल्याचेही त्यांनी जाहीर केलं.

राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी काल अण्णा हजारे यांच्याशी वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाबाबत चर्चा केली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी ग्रामसभा बोलावली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रात दारू कमी आहे? बीयर बारचे दुकाने आहेत ना. परमिट रुमही आहेत. वाईन शॉपीचे दुकानेही आहेत. त्यात वाईन मिळते ना? तुम्ही परत दुकानात का ठेवता? सुपर मार्केटमध्ये का ठेवता? एवढी दुकाने असताना आणखी का ठेवता? सर्व लोकांना व्यसानाधिन करायचं आहे का? लोक व्यसनाधीन झाले की आपल्याला जे साधायचं ते साधून घ्यायचं असा काही डाव आहे का? अरे व्यसानाने बरबाद झाले ना लोक. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही बालकं आमची संपत्ती आहे. ही बालकं व्यसनाधीन झाली तर काय होणार?, असा सवाल अण्णा हजारे यांनी केला.

तेव्हा सरकारने हालचाली सुरू केल्या

सुपर मार्केट आणि किराणा दुकानात विक्री केल्यास महाराष्ट्रातील बालके, तरुण महिला आणि मुलींवर खूप अन्याय अत्याचार होतील. म्हणून मी सरकारला निरोप पाठवला. सरकारचे लोक चर्चेला आले. मी सगळं ऐकलं. मी त्याला उत्तर म्हणून एकच सांगितलं. तुमचं ऐकलं. आता माझा सरकारला एक निरोप द्या. तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिली नाही. एवढा निरोप सांगा. मी असं म्हटल्यावर सरकारने हालचाली सुरू झाल्या. काल एक्साईज डिपार्टमेंटचे कमिश्नर आले. मी म्हटलं तुमच्यावर विश्वास नाही. तुम्ही वाईन का आणता आणि खुल्या बाजारात का विक्रीला ठेवता? म्हणून मला तुमच्या राज्यात जगायचं नाही, असं हजारे म्हणाले.

ही लोकशाही नाही, हुकूमशाही होईल

प्रश्न राळेगणचा नाही, राज्याचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाईन संस्कृती आहे? ज्ञानेश्वर, तुकारामांच्या राज्यात वाईन संस्कृती आहे? ही संस्कृती जतन करण्यासाठी कीर्तनकार किर्तन करतात. मुलांवर संस्कार करण्यासाठी ते प्रवचन करतात. तुम्ही किराणा दुकाना वाईन ठेवून ही संस्कृती बरबाद करायला निघाला. म्हणून जगायची इच्छा होत नाही. झालं 84 वर्ष. खूप झालं. ईश्वराने खूप कामे करून घेतली. यादवबाबाने कामे करून घेतली. खूप झालं. अशा प्रकारचे निर्णय सरकार घेतंय. काल सेक्रेटरी काल मुंबईहून आले. आमच्या चर्चा झाल्या. मी त्यांना म्हटलं लोकशाहीला मानताना. मग लोकांमार्फत निर्णय का घेतला नाही? तुम्ही मनाने निर्णय घेता. तुम्ही जनतेची परवानगी घ्यायला हवी होती. ते मालक आहेत. तुम्ही सेवक आहात. प्रजासत्ताक आहे या देशात. सेवकाने मालकाची परवानगी घ्यायला हवी. ही लोकशाही नाही, ही हुकूमशाही होईल. म्हणून म्हटलं तुमच्या राज्यात जगायची इच्छा नाही, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Maharashtra News Live Update : वाईन आमची संस्कृती आहे का?, अण्णा हजारेंचा सवाल

चंद्रकांत पाटील फार मोठी व्यक्ती, त्यांच्यावर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यानं बोलणं बरोबर नाही : अजित पवार

VIDEO: चंद्रकांतदादा निष्पाप, स्वच्छ हृदयाचे, सरकार पडत नसल्याने नैराश्यात, पण प्रयत्न सुरू ठेवा; राऊतांचे चंद्रकांत पाटलांना चिमटे