
नाशिकच्या सिन्नरमधील भोंदूबाबा उर्फ स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याचा पाय खोलात आहे. महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली तुरूगांची हवा खाणारा भोंदू अशोक खरात याने इतकी अश्लील, घाणेरडी कृत्य केली आहेत ना, की एकेकाची माहिती समोर आल्यावर वाचणाऱ्यालाच घाम फुटेल. जेलमध्ये त्याची कसून चौकशी सुरू असून हे प्रकरण समोर आल्यापासून आता त्याच्यावर 3 गुन्हे दाखल झाले आहेत. स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेल्या कॅप्टन खरातच्या अडणची आता आणखीनच वाढणार आहेत. त्याच्याविरोधात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा अंतर्गत (पीसीपीएनडीटी ) गुन्हा दाखल होऊ शकतो, एवढंच नव्हे तर वन्यजीव संरक्षण प्रतिबंधक कायदा अंतर्गतही त्याच्यावर कलमं लागू शकतात. त्यामुळे आता त्याची पोलिसांच्या तावडीतून सुटका होण्याची शक्यता अगदी धूसर आहे.
संतती प्राप्तीसाठी अशोक खरातकडून टोटके
अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून खरातची कसून चौकशी सुरू आहे. तसेच शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली असून त्यातून अनेक खुलासे होणार आहेत. त्याच्या फार्महाऊसवरील कर्मचारी आणि मंदिरातील पुजारी यांचीही चौकशी होणार असल्याचे समजते. दरम्यान सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अशोक खरातचा पाय खोलात गेला आहे, कारण त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल होऊ शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, खरात याच्यावर गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा म्हणजेच पीसीपीएनडीटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. मुलगा हवा की मुलगी.. असं म्हणत त्याने संतती प्राप्तीसाठी अनेक टोटके केल्याचे उघड झाले आहे. एवढंच नव्हे तर त्याने सात महिन्याच्या गर्भवती महिलेवर पूजा विधीच्या नावाखाली अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता, त्यासंदर्भात त्याच्यावर दुसरा गुन्हाही दाखल झाला होता.
एवढंच नव्हे तर खरात याने वेगवेगळ्या वन्य जीवांची कातडी वापरल्याचाही उल्लेख असल्याने, त्याच्यावर वन्यजीव संरक्षण प्रतिबंधक कायदा अंतर्गतही कलमं लागू शकतात. आता असे वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्यास खरात याची पोलिसांच्या तावडीतून सुटण्याची शक्यता अतिशय धूसर आहे.
शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खरातचे अनेक कारनामे
भोंदू बाबा अशोक खरातने शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनेक कारणामे केल्याचंही समोर आलं आहे. दारणा धरणातून गोदावरी नदीत सोडले जाणारे पाणी शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असताना भोंदू अशोक खरातने हे पाणी स्वतःच्या संस्थानाकडे वळवून घेतल्याचं उघड झालं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा शासन निर्णय झाला होता. मिरगाव येथे शिवनिका संस्थानच्या लगत, गोदावरी नदीच्या कालव्यावर बंधारा बांधण्यात आला आहे. त्या माध्यमातून खरात याने बिगरसिंचनाच्या नावाखाली हे पाणी स्वतःच्या संस्थाकडे वळवून घेतलं आणि परिसरात आमराई तसेच शेती फुलवली . त्यामुळे भोंदू खरातने केवळ शासनाचीच नाही, तर परिसरातील शेतकऱ्यांचे पाणी पळवून त्यांची देखील फसवणूक केली आहे अशी माहिती उघड झाली आहे.
खरातचे हात छाटणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस
दरम्यान अनेक महिलांची फसवणूक, लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या खरातचं प्रकरण राज्यभरात गाजत आहे. याच भोंदू बाबाचा हात छाटणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस देऊ अशी घोषणा गनिमी कावा संघटनेने केली आहे. आज पुण्यात बालगंधर्व चौकात गनिमी कावा संघटनेने खरात विरोधात आंदोलनही केलं.