महाराष्ट्राची वाघिण कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणात किल्ल्यातील रजिस्टर नोंदणीवरून मोठी खळबळ, थेट पतीच..
नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी धक्कादायक निर्णय घेतला. आता या प्रकरणात आता थक करणारी माहिती पुढे येत आहे. यावरून कळतंय की, अश्विनी यांच्या मनात गेल्या काही दिवसांपासून प्लॅनिंग सुरू होते.

श्रीराम क्षीरसागर धाराशिव : नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनेनंतर तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दुपारी 1 वाजून 13 मिनिटांनी अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह किल्ल्यात प्रवेश केला. प्रवेशद्वारावरील रजिस्टरमध्ये त्यांची नोंद करण्यात आली. त्यावेळी माझे पती पाठीमागून येत आहेत, असे त्यांनी रजिस्टरची नोंद करणाऱ्या पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्याला सांगितल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी किल्ल्यातील प्रवेश नोंद रजिस्टरची पाहणी करून संबंधित माहिती घेतली. त्यामुळे अश्विनी पौळ किल्ल्यात नेमक्या कोणत्या परिस्थितीत दाखल झाल्या, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, किल्ल्यात पर्यटकांना खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास निर्बंध असल्याने मुलाचा वाढदिवस असल्याचे सांगत अश्विनी पौळ यांनी चॉकलेट आणि केकसोबत नेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या तीन मुलांपैकी एकाचाही त्या दिवशी वाढदिवस नव्हता, अशी माहिती तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे. अश्विनी यांनी वाढदिवसाचे का सांगितले, याच तपास पोलिसांकडून केला जातोय.
वाढदिवसाचे कारण सांगून चॉकलेट आणि केक किल्ल्यात नेण्यामागे नेमका काय उद्देश होता? याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे .घटनेपूर्वी किल्ल्यात प्रवेश करताना केलेली नोंद, कर्मचाऱ्यांशी झालेला संवाद आणि त्यानंतरची परिस्थिती याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. खरोखरच महिलेचा पती मागून गेला का? असाही प्रश्न यादरम्यान उपस्थित केला जातोय. इतक्या मोठ्या कुस्तीपटूने असा धक्कादायक निर्णय घेतल्याने मोठी खळबळ उडाली.
नळदुर्ग भुईकोट किल्ल्यात कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनेनंतर किल्ल्यातील सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किल्लेदार नागनाथ गवळी यांच्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत नळदुर्ग किल्ल्याच्या विविध ठिकाणाहून लोकांनी आयुष्याचा शेवट केला. अश्विनी पौळ यांनी काही दिवसांपूर्वीच आपली मुंबईतील नोकरी सोडली. मुंबईतील नोकरी सोडून त्या आपल्या माहेरी राहत होत्या. सासरच्या मंडळींसोबत त्यांचा वाद होता.