कधी थांबणार विजांचा थयथयाट? औरंगाबादेत 15 जनावरं दगावली, आकाशात गडगडाट अन् गावात भयाण शांतता

| Updated on: Oct 08, 2021 | 7:28 PM

मराठवाड्यातील बहुतांश गावांतील सध्याचं चित्र पाहिलं तर दुपारनंतर आकाशात भयंकर गडगडाट पहायला मिळतोय, पण आपली माणसं, आपली जनावरं पोटाशी धरून हे संकट कधी दूर होईल, सरकारची मदत कधी पोहोचेल, या विचारानं गावा-गावांमध्ये भयाण शांतता पसरलेली दिसत आहे.

कधी थांबणार विजांचा थयथयाट? औरंगाबादेत 15 जनावरं दगावली, आकाशात गडगडाट अन् गावात भयाण शांतता
वीज कोसळल्याने औरंगाबादेतल्या गावात 15 जनावरे दगावली.
Follow us on

औरंगाबाद: मान्सून परतीच्या वाटेवर असतानाही मराठवाड्यात वीजांचा थयथयाट (lightning struck) सुरुच आहे. दुपारनंतर आकाशातून वीजा कडाडल्याचे आवाज सुरु होतात आणि पाहता पाहता धो-धो पावसाला (Thunderstorm in rural area) सुरुवात होते. मराठवाड्याच्या अनेक गावांमधील लहान-मोठ्या नद्यांना पूर आला असून दररोज या पुरात वाहून गेल्याची एखादी तरी बातमी येते. अनेक गावांमध्ये वीज पडून जनावरं दगावत आहेत. शुक्रवारीही औरंगाबादमधील एका गावात चरण्यासाठी गेलेली अवघी 15 जनावरं वीज कोसळल्याने मृत्यूमुखी पडली. गेल्या महिनाभरात मराठवाड्यासह राज्यभरात ठिकठिकाणी वीज पडून जनावरं तसंच माणसं दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.

जेहूर – ठाकूरवाडी व उंबरखेडा येथे गायरानात वीज कोसळली

औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील जेहूर – ठाकूरवाडी व उंबरखेडा या गावात शुक्रवारी दुपारी काही शेतकरी आपली गुरे चरण्यासाठी नेली होती. मात्र अचानक वीजांचा कडकडाट सुरु झाला. शेतकऱ्यांनी आपली गुरे घरी नेण्यासाठी तयारी सुरु केली तेवढ्यात आकाशातून आलेली वीज येथील पशुधनावर कोसळली. दरम्यान, दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यावेळी जेहूर – ठाकूरवाडीजवळ गट नंबर 70 मधील गायरानात वीज कोसळली. यात शिवराम मेंगाळ यांचे 3 (2 गाय व वासरू), पुंजाराम मधे यांचे 8 (5 गाय 3 वासरु) व अंबादास मेंगाळ यांचा 1 बैल दगावला. तर दुसऱ्या घटनेत उंबरखेडा येथील अविनाश नामदेव निकम यांच्या शेतात (गट क्र 61) सुद्धा वीज कोसळल्याने एका जनावराचा मृत्यू झाला.

नाशिक परिसरातही वीजांचं तांडव

त्र्यंबक तालुक्यात गुरुवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडली. त्यात पहिल्या घटनेत चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे हे तरुण शेतकरी (वय 38) रानात गुरे चारत होते. दुपारी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सामुंडी येथे एका झाडावर वीज कोसळली. या झाडाजवळच्या घरातील रंजना वसंत लोमटे (वय 45) व त्यांच्या तीन मुली व मुलगा यांना वीजेचा जबर झटका बसला. त्यात रंजना थोडावेळ बेशुद्ध पडल्या. तर त्यांची नऊ वर्षांची मुलगी छायाला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिची एक बाजू पूर्णतः बधीर झाली आहे, तर इतर दोन मुली अपेक्षा (वय 14) आणि अक्षरा (वय 11) यांच्या हाताला झटका पडून बेशुद्ध पडले. मात्र, त्यांची प्रकृती ठीक आहे. तिसऱ्या घटनेत अंबई माळरानावर वीज पडली. या घटनेत येथे चरणाऱ्या दहा शेळ्या जागीच ठार झाल्या. सुनील भुतांबरे यांच्या या शेळ्या होत्या.

आकाशात गडगडाट… गावात भयाण शांतता

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याचं अवघं वैभव नष्ट झालं आहे. बांधावर, घरात, गावात सर्वत्र पावसाचा हाहाकार पहायला मिळत आहे. हाता-तोंडाशी आलेलं पिक डोळ्यादेखत वाहून गेलं. काही ठिकाणी तर अवघ्या जमिनीच खरवडून निघाल्या. आता पुन्हा धान्य पेरायचं तरी कुठं, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यातच पिक गेलं तरी पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या जनावरांवर शेतकऱ्यांची भिस्त आहे. पण त्यांनाही या आसमानी संकटानं गिळंकृत केलं तर भविष्यात हा बळीराजा आणखी खचून जाईल, अशीच अवस्था आहे. मराठवाड्यातील बहुतांश गावांतील सध्याचं चित्र पाहिलं तर दुपारनंतर आकाशात भयंकर गडगडाट पहायला मिळतोय, पण आपली माणसं, आपली जनावरं पोटाशी धरून हे संकट कधी दूर होईल, सरकारची मदत कधी पोहोचेल, या विचारानं गावा-गावांमध्ये भयाण शांतता पसरलेली दिसत आहे.

इतर बातम्या- 

बारामतीत मोठी दुर्घटना, शेतात काम सुरु असताना अचानक वीज कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू, एक अत्यवस्थ

वीजेच्या तांडवात शेतकरी ठार, माय-लेकीसह पाच जण बेशुद्ध; नाशिक जिल्ह्यात 10 शेळ्यांचाही मृत्यू