आरक्षण योग्य की अयोग्य? अभिजीत दीपकेंची भूमिका काय? हा कोटा रद्द करण्याची मागणी
अभिजीत दीपके आरक्षणाचे जोरदार समर्थन करतात, कारण ते वंचितांना शिक्षणाची संधी देते. त्यांच्या मते, आरक्षणामुळे कुणाला अडचण होऊ नये; उलट, देशात शाळा आणि महाविद्यालयांची संख्या वाढवून सर्वांना शिक्षण उपलब्ध करून द्यावे. दीपके मॅनेजमेंट कोटा रद्द करण्याची मागणी करतात, जो श्रीमंतांसाठी असतो, आणि गरिबांना शिक्षण मिळणे आवश्यक असल्याचे ठामपणे मांडतात.

जंतरमंतरवरील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अभिजीत दीपके सध्या पुढच्या रणनीतीच्या कामाला लागले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका व्यक्त केली आहे. अभिजीत दीपकेंनी आरक्षणाचं समर्थन केलं आहे. आरक्षणामुळे कुणाला अडचण होता कामा नये, असं दीपकेंनी म्हटलं आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांची संख्या वाढवली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कॉकरोच जनता पार्टी आता आपल्या टीमचा विस्तार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत दीपकेंनी ही भूमिका मांडली आहे. एखाद्या वंचिताला शिकण्याची संधी मिळत असेल तर त्यात चुकीचं काय? जास्तीत जास्त लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना शिक्षण कसं मिळेल आणि जे लोक शिक्षण घेऊ शकत नाही, त्यांनाही शिक्षण कसे मिळेल हाच आपला प्रयत्न असला पाहिजे, असं अभिजीत दीपकेंनी म्हटलं आहे.
गाडी, बंगला तर मागत नाहीये ना?
आरक्षण मिळणं यात काही चुकीचं नाहीये. आरक्षण घेणारे काही गाडी, बंगला मागत नाहीये. आणि आपणही त्यांना काही गाडी, बंगला तर देत नाही ना? आपण शिक्षण देत आहोत. आपण त्यांना शिक्षण देतोय. त्यामुळे तो मुलगा, त्याचं कुटुंब आणि त्याचा समाज मुख्य प्रवाहात येणार आहे. त्यामुळे मला वाटतं आरक्षण देण्यात काही चूक नाहीये, असं अभिजीत यांनी स्पष्ट केलं.
महाविद्यालयांची संख्या वाढवा
यावेळी त्यांनी देशातील शिक्षण संस्थांची संख्या वाढवण्याचा सल्ला दिला. अशी मागणी सरकारच्या समोर उठवली गेली पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आरक्षणामुळे जागा कमी होत आहेत, आपण हेच म्हणतोय ना? मग सरकारला सांगा जागा वाढवा म्हणून. सरकारला सांगा महाविद्यालयांची संख्या वाढवा. सरकारला सांगा ना की शाळांची संख्या वाढवा, असं ते म्हणाले.
मॅनेजमेंट कोटा रद्द करा
यावेळी त्यांनी शिक्षण संस्थांमधील मॅनेजमेंट कोटा रद्द करण्याची मागणी केली. तुम्ही आरक्षणाच्या विरोधात बोलता, तसं मॅनेजमेंट कोटाच्या विरोधात का बोलत नाही? मॅनेजमेंट कोटा प्रत्येक महाविद्यालयात असतो. तिथे पैसे देऊन प्रवेश दिला जातो. त्याच्या विरोधात कोणीच बोलत नाही. तिथेही आपला हक्क हिरावला जात आहे. इथे तर गरीबांना शिक्षण मिळत आहे. त्यामुळे गरीबांना शिक्षण मिळण्यास कुणाला अडचण असू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
5 ऑगस्ट रोजी बैठक
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सीजेपीचे प्रमुख सदस्य 5 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगरमध्ये एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत संघटनेच्या भविष्यातील रणनीतीवर आणि कार्य योजनेवर चर्चा करणार आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या घरी ही बैठक होणा र असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दीपकेंनी पार्टीच्या प्रमुख सदस्यांना स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करून मिटिंगमध्ये मुद्दे आणायला सांगितलं होतं.