गोमूत्रांचे टँकर मागवून ठेवा, तुटवडा पडण्याची शक्यता, अंबादास दानवेंनी भाजप नेत्यांना सुनावलं

| Updated on: Apr 05, 2023 | 8:36 AM

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पुन्हा अपशब्द बोलाल तर तुम्हाला बाहेर फिरणे मुश्कील होईल, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्यानंतर शिवसेना नेतेही आक्रमक झाले आहेत.

गोमूत्रांचे टँकर मागवून ठेवा, तुटवडा पडण्याची शक्यता, अंबादास दानवेंनी भाजप नेत्यांना सुनावलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

छत्रपती संभाजीनगर : ठाण्यातील रोशनी शिंदे (Roshani Shinde) प्रकरणानंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध भाजप-शिवसेना (BJP Shivsena) वातावरण चांगलंच तापलंय. ठाण्यातील प्रकारानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस गृहमंत्री असे उद्धव ठाकरे यांनी संबोधले आणि याचे पडसाद राज्यभर उमटले. राज्यभरातील भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांनी मर्यादा सोडली तर तुम्हाला बाहेर फिरणं मुश्किल होईल, अशी टीका केली. बावनकुळे यांना अंबादास दानवे यांनी सडेतोड उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्रभर फिरणार आहेत. भाजप नेत्यांनी फक्त गोमूत्र शिंपडत रहावे. छत्रपती संभाजीनगर येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सभास्थळावर गोमूत्र शिंपडल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यावरून अंबादास दानवे यांनी हा टोला लगावलाय.

अंबादास दानवेंचं ट्विट काय?

ठाकरे समर्थक आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला. त्यात त्यांनी लिहिलंय-
@cbawankule
जी, आपण म्हणता उद्धव साहेबांना बाहेर पडणे मुश्किल होईल. गोमूत्राचे टँकर मागवून ठेवा कारण त्याचा राज्यात तुटवडा पडण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम मिळेल एखादा. कारण उद्धवसाहेब महाराष्ट्रभर फिरतील आणि तुम्ही ते नंतर शिंपडत बसा. पगार किती, बोलता किती?

राम मंदिरात का नाही शिंपडलं?

खासदार इम्तियाज जलील श्रीराम मंदिरात गेले, त्या ठिकाणी भाजप नेत्यांनी गोमूत्र शिंपडलं नाही. पण महाविकास आघाडीची वज्रमुठ एकवटली, तिथे गोमूत्र शिंपडण्यात आलं. तिथे जमलेल्या हजारो, लाखो जनतेचा हा अपमान आहे. ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अपमान होतो, तेच लोक सावरकरांची यात्रा काढतात, हा ढोंगीपणा आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

बावनकुळे काय म्हणाले?

महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभलाय, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. इथून पुढे फडणवीसांबद्दल बोललात तर तुम्हाला सोडणार नाहीय. राज्याचा अध्यक्ष म्हणून मी उद्धव ठाकरेंना सांगतो की, आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे. यानंतर बोललात तर लक्षात ठेवा, ही धमकी आहे, असं समजा, असा इशारा बावनकुळे यांनी काल पत्रकार परिषदेतून दिला. त्यावरून शिवसेना नेतेही प्रत्युत्तर देत आहेत.