Aurangabad | एकाच कॉलनीत 1200 अनधिकृत नळ!! अधिकारीही चक्रावले, औरंगाबादेत पाणीचोरीविरोधात मनपाची मोठी मोहीम

| Updated on: May 18, 2022 | 2:03 PM

आता मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन अशा प्रकारच्या अनधिकृत नळांची कापणी मोहीम लवकरच महापालिकेतर्फे सुरु केली जाणार आहे.

Aurangabad | एकाच कॉलनीत 1200 अनधिकृत नळ!!  अधिकारीही चक्रावले, औरंगाबादेत पाणीचोरीविरोधात मनपाची मोठी मोहीम
Follow us on

औरंगाबादः शहरातील पाणी प्रश्नाने (Water issue) गंभीर रुप घेतलं असून तुटपुंज्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण आहेत. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्ष आणि नागरिकांनी आक्रमक आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिकेची (Aurangabad municipal corporation) यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे. मनपा प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. अनधिकृत नळांचा (unauthorized connections) शोध घेण्यासाठी प्रशासनाने एक खास पथक तैनात केले आहे. हे पथक विविध भागांतील वसाहतींची पाहणी करत आहे. पहाडसिंगपुरा रोडवर 400 मीमी व्यासाच्या जलवाहिनीवर किमान 1200 अनधिकृत नळ पाहून मनपाचे अधिकारीही थक्क झाले. आता मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन अशा प्रकारच्या अनधिकृत नळांची कापणी मोहीम लवकरच महापालिकेतर्फे सुरु केली जाणार आहे.

शहरातील अधिकृत ग्राहक किती?

घरगुती- 1,29,000
व्यावसायिक – 6000
एकूण- 1, 35,000

अनधिकृत नळ किती?

शहरातील मालमत्तांची संख्या जवळपास 4 लाख एवढी आहे. यापैकी 10 टक्के नागरिकांच्या वसाहतीत जलवाहिन्याच टाकलेल्या नाहीत. उर्वरीत नागरिकांकडे नश असतीलच असे मनपाला वाटते. महानगरपालिकेच्या रेकॉऱ्वर 1 लाख 35 हजार ग्राहक आहेत. तरीही एक लाखाहून अधिक अनधिकृत नळ असावेत असा मनपाचा प्राथमिक अंदाज आहे. हा आकडाही अपेक्षेपेक्षा जास्त असू शकतो.

हे सुद्धा वाचा

पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मनपाची धावाधाव

यंदाच्या उन्हाळ्यात अनेक वर्षांपासूनचा पाणीप्रश्न अधिक तीव्र झाला आहे. महिनाभरापूर्वी काही वसाहतींना आठव्या किंवा नवव्या दिवशी पाणी येत होते. काही वसाहतींना तीन तर काहींना चौथ्या दिवशी पाणी मिळत होते. ही तफावत दूर करावी, अशी मागणी होती. मनपाने शहरात पाच दिवसाआड पाणी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता सिडको आणि हाडकोतील पाण्यासंदर्भातील तक्रारी कमी झाल्या.

पहाडसिंगपुरा भागात तक्रारी

सिडको-हडकोतील तक्रारी कमी झाल्या असल्या तरीही पहाडसिंगपुरा, लक्ष्मी कॉलनी, शांतीपुरा भागात पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. शोध घेतल्यानंतर जलवाहिन्यांवरील शेकडो नळ कनेक्शनमुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणीच जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. आता येथील अनधिकृत नळ तोडण्यासाठी महापालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. यात महिला पोलीसही असाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. हा परिसर बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो.

पाणीपुरवठ्याची वेळ करणार अ‍ॅपवर

स्मार्ट सिटीच्या वतीने शहरातील विविध कॉलन्यांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्याची वेळ कळण्यासाठी महापालिकेने जलबेल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. यावर पाणीपुरवठ्याच्या वेळ, विलंब होत असल्यास त्याचे कारण, आदी माहितीचे सतत अलर्ट मिळणार आहेत. सध्या पहिल्या टप्प्यात हे अ‍ॅप सिडको एन-5 जलकुंभाअंतर्गत येणाऱ्या वसाहतींमध्ये अ‍ॅक्टिव्ह असेल.