औरंगाबाद: गणेशोत्सवानंतर बाप्पांच्या मूर्ती विसर्जनाकरिता महापालिकेने (Aurangabad Municipal corporation ) यंदा आधीपासूनच विसर्जन विहिरींच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी काही विहिरींच्या स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. तरीही नागरिकांनी जवळच्याच कोणत्याही पाण्याच्या स्रोतात गणेशमूर्तींचे विसर्जन (Ganesh murti visarjan) करण्याऐवजी औरंगाबाद महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन विहिरींवरच मूर्तींचे विसर्जन करून सहकार्य करण्याच आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
शहरातील विहिरी, तलाव यांमध्ये गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन होऊन, त्यामुळे पाणी प्रदुषण तसेच मूर्तींची विटंबना होऊ नये, या उद्देशाने महापालिकेतर्फे बाप्पांच्या मूर्ती विसर्जनासाठी विशेष सोय उपलब्ध करून दिली जाते. याअंतर्गत यावर्षी शहरातील 9 परंपरागत विहिरींतील गाळ काढणे व दोन कृत्रिम तलाव तयार करणे अशा एकूण अकरा ठिकाणची कामं सुरु आहे. यासाठी महापालिकेने 42 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती सूत्रांकडून मिळली. सध्या जालाननगर येथील विहिरीचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत कामही अंतिम टप्प्यात आहे. विहिरींच्या ठिकाणी रंगरंगोटीची कामंही सुरु आहेत.
महापालिकेने गणेशाच्या मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांकरिता विशेष सोय केली आहे. याअंतर्गत भावसिंगपुरा, औरंगपुरा, हडको एन13, संघर्षनगर, संतोषीमाता नगर, मुकुंदवाडी गाव, शिवाजीनगर, सातारा गाव, जालाननगर, ज्योती नगर (कृत्रिम तलाव), हर्सूल तलाव स्मृतिवन (कृत्रिम तलाव) आदी ठिकाणांचा समावेश आहे.
शहरातील औरंगाबाद जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीतर्फे यंदा महालक्ष्मीच्या देखाव्यांसाठी ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली आहे. याअंतर्गत 13 आणि 14 सप्टेंबर रोजी नागरिकांना आपल्या महालक्ष्मींच्या देखाव्यांचे फोटो, सजावटीचे छायाचित्र महासंघाने दिलेल्या फोन नंबरवर पाठवायचे आहेत. 9028355555 आणि 9921319121 या संपर्कक्रमांकावर नागरिक फोटो पाठवू शकतात. तरीही देखाव्यांच्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष अभिषेक देखमुख, कार्याध्यक्ष किशोर तुशळीबागवाले यांनी केले आहे.
इतर बातम्या-
Aurangabad Waterfall | औरंगाबादच्या अजिंठा लेणीतील वाघूर धबधबा प्रवाहित, पाहा मनमोहक दृश्य