बोगस लसीकरण टाळण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना रोज नवा पासवर्ड, औरंगाबादेत आतापर्यंत दोन वेळा कोविन अ‍ॅप हॅक

| Updated on: Sep 30, 2021 | 1:11 PM

लस न घेता प्रमाणपत्र मिळणाऱ्या प्रकारांना आळा बसावा, यासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना दिला जाणारा पासवर्ड आता आरोग्य अधिकाऱ्यांना दिला जाणार आहे. हा पासवर्ड दररोज बदलण्यात येईल.

बोगस लसीकरण टाळण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना रोज नवा पासवर्ड, औरंगाबादेत आतापर्यंत दोन वेळा कोविन अ‍ॅप हॅक
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) न घेताच लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोविन अ‍ॅपमध्ये (Covin App) नावे घुसवल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये दुसऱ्यांदा उघडकीस आला. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी लस देणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांना मनपा दररोज एक पासवर्ड देणार आहे. यामुळे लस घेतल्याचे दाखवून बोगस प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रकाराला आळा बसेल, अशी खात्री औरंगाबाद महानगर पालिकेला (Aurangabad Municipal cororation) आहे.

कोविन अ‍ॅप दोन वेळा हॅक

कोरोना प्रतिबंधक लस न घेताच प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोविन अ‍ॅप हॅक करून त्याने नावे घुसवण्याचे प्रकार औरंगाबादेत दोन वेळा घडले आहे. मागील महिन्यात अ‍ॅपमध्ये अशा तब्बल 16 जणांची नावं, तेदेखील एकाच कुटुंबातील नावं घुसवल्याची घटना समोर आली होती. हा प्रकार कुणी केला हे अद्याप समोर आलेले नाही.

मंगळवारी बायजीपुऱ्यातही अ‍ॅप हॅक

मंगळवारी शहरातील बायजीपुरा येथील आरोग्य केंद्रातही लसीकरणादरम्यान असा प्रकार घडला.. लस न घेताच प्रमाणपत्रांसाठी तीन नावे घुसवल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला. या प्रकरणी महापालिकेने जिन्सी पोलीस ठाण्यासह सायबर सेलकडे तक्रार दिली आहे. मात्र शहरात दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकारामुळे महापालिका खडबडून जागी झाली असून या प्रकारांना आळा घालण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना वेगळा पासवर्ड देण्याचे महापालिकेने ठरवले आहे.

दररोज बदलणार पासवर्ड

लस न घेता प्रमाणपत्र मिळणाऱ्या प्रकारांना आळा बसावा, यासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना दिला जाणारा पासवर्ड आता आरोग्य अधिकाऱ्यांना दिला जाणार आहे. हा पासवर्ड दररोज बदलण्यात येईल. आरोग्य अधिकारी तो पासवर्ड डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना देतील. त्यानंतर लसीकरणासाठीची नोंदणी सुरु होईल. पासवर्डची माहिती केवळ आरोग्य अधिकारी आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर्सकडेच असेल, अशी माहिती औरंगाबाद महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात मनपा हद्दीत 20, तर ग्रामीण भागात 14 अशा एकूण 34 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच बुधवारी 19 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. सुदैवाने गेल्या 24 तासात जिल्ह्यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

एंट्री पॉइंटवर 189 जणांची चाचणी

महापापिलेकतर्फे शहराच्या सहा एंट्री पॉइंटवर नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. बुधवारी 189 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात कुणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले नाही. चिकलठाणा येथे 20 जणांची चाचणी करण्यात आली. हर्सूल टी पॉइंट येथे 35 जणांची, कांचनवाडी येथे 31 जणांची, झाल्टा फाटा येथे 22 जणांची, नगरनाका येथे 30 जणांची तर, दौलताबाद टी पॉइंट येथे 51 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. याठिकाणी कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले नाही.

इतर बातम्या-

Aurangabad: हॉस्पिटलच्या एका बेडचा कचरा काढण्यासाठी 5 ऐवजी लावले 100 रुपये, नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला मनपाची नोटीस