औरंगाबाद की संभाजीनगर? शहरवासियांची उत्तरं चकित करणारी… हिंदुत्ववादी संघटना तेजीने मोहीम राबवणार

| Updated on: Mar 14, 2023 | 8:53 AM

औरंगाबाद की संभाजीनगर, शहरवासियांना नेमकं काय हवंय, या प्रश्नाची विभागीय आयुक्तालयाकडे आलेली उत्तरं राजकीय नेत्यांना चकीत करणारी आहेत.

औरंगाबाद की संभाजीनगर? शहरवासियांची उत्तरं चकित करणारी... हिंदुत्ववादी संघटना तेजीने मोहीम राबवणार
Image Credit source: social media
Follow us on

छत्रपती संभाजीनगर | राज्य सरकारमधील (Maharashtra govt) नेत्यांनी केवळ राजकीय स्वार्थापायी औरंगाबादचं (Aurangabad) नाव छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) केलंय, असा आरोप खा. इम्तियाज जलील यांनी केलाय. पण शहरातील नागरिकांना नेमकं काय हवंय, यासाठी जनमत चाचणी घ्यावी, अशी मागणी खा. जलील यांनी लावून धरली आहे. ही जनमत चाचणी अद्याप झालेली नाही, मात्र जिल्ह्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात शहराच्या नामांतरावरून हरकती आणि आक्षेप मागवण्यात आले होते. शहर तसेच जिल्ह्याच्या नामांतर प्रक्रियेचा भाग म्हणूनच ही मतं मागवण्यात आली होती. यात शहरवासियांकडून आलेली उत्तरं धक्कादायक आहेत. 13 मार्चपर्यंत औरंगाबाद नावाच्या समर्थनार्थ 11,802 अर्ज तर छत्रपती संभाजीनगरचे समर्थन करणारे केवळ  35अर्ज दाखल झाले आहेत. 26 फेब्रुवारीपासून नामांतराची अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. तेव्हापासून हरकती आणि आक्षेप मागवण्यात येत आहेत. शहरवासियांनी दाखल केलेले अर्ज पाहून हिंदुत्ववादी संघटना पुढे सरसावल्या आहेत.

10 हजार पोस्टकार्ड पाठवणार

शहरवासियांनी दाखल केलेल्या हरकती आणि आक्षेपांच्या संख्येमुळे हिंदुत्ववादी संघटना जाग्या झाल्या आहेत. आज शहरातील विविध भागात नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ अर्ज भरून घेतले जातील. उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारीही सक्रिय झाले आहेत. आजपासून गुलमंडी येथे नागरिकांकडून पोस्टकार्ड भरून घेतले जातील. गुलमंडीवरील प्रत्येक दुकानात छत्रपती संभाजीनगरचा बोर्ड लावण्यात येतोय. त्याच्या समर्थनार्थ नागरिकांकडून पोस्टकार्डवर अर्ज लिहून घेतला जातोय. तर सकल हिंदु जनजागरण समितीच्या वतीने शहराच्या चौका-चौकात आणि ग्रामीण भागातील गावा-गावात छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ टेबल लावून अर्ज एकत्र करून 25 मार्चपर्यंत ते जिल्हा प्रशासनाकडे सादर केले जातील.

फडणवीसांनी मित्राची समजूत काढावी..

दरम्यान शहराच्या नामांतरविरोधात एमआयएम आणि नामांतरविरोधी संघटनांचे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरुच आहे. ठाकरे गटाचे नेते किशनचंद तनवानी यांनी यावरून देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 साली औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण केलं. तेव्हापासून 35 वर्षे झाली, हे शहर संभाजीनगर म्हणून ओळखलं जातं. मात्र एमआयएमने विरोध सुरूच ठेवला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या मित्राची समजूत काढावी, असा टोला किशनचंद तनवाणी यांनी लगावला आहे.