Omicron in Aurangabad: दुबईहून आलेल्या व्यक्तीचे नातेवाईक निगेटिव्ह, औरंगाबादला आणखी कशाची चिंता?

| Updated on: Dec 27, 2021 | 10:00 AM

औरंगाबादमध्ये दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचे ओमिक्रॉनचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीही शहराची चिंता अजून काय असून सात दिवसानंतर त्यांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येईल. तसेच विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर मनपाला करडी नजर ठेवावी लागेल.

Omicron in Aurangabad: दुबईहून आलेल्या व्यक्तीचे नातेवाईक निगेटिव्ह, औरंगाबादला आणखी कशाची चिंता?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगबाादः जिल्ह्यात ओमिक्रॉनचे दोन (Omicron in Aurangabad) रुग्ण आढळले असून या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी कठोर नियमावली जारी केली आहे. शहरात इंग्लंड आणि दुबईहून आलेल्या व्यक्तीचे ओमिक्रॉनचे नमूने अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जास्त खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, दुबईहून शहरात आलेल्या 33 वर्षीय तरुणाच्या कुटुंबातील तिघांचे अहवाल रविवारी निगेटिव्ह आल्याने शहराला तूर्तास दिलासा मिळाला आहे, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा (Dr. Paras mandlecha) यांनी दिली.

तूर्त धोका टळला, शहराची चिंता कायम

दुबईहून आलेल्या तरुणाची ओमिक्रॉनची चाचणी शनिवारी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला मेल्ट्रॉन रुग्णालयात हलवले. त्यानंतर त्याच्या तीन नातेवाईकांची तपासणी केली. त्यांचे अहवाल सध्या निगेटिव्ह आले आहेत. मात्र, आरोग्य विभागाची चिंता कमी झालेली नाही. सात दिवसानंतर पुन्हा या सर्वांची टेस्ट केली जाणार असून, तोपर्यंत धोका कायम राहणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शहराला सतावणारी आणखी एक चिंता म्हणजे, विदेशातून आलेल्या व्यक्तींमध्ये युएई आणि अमेरिकेतून येणाऱर्यांची संख्या जास्त आहे. या दोन्ही ठिकाणी ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या अनुशंगाने विदेशातून प्रवास करून आलेल्या प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात रविवारी 12 कोरोनाबाधित

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी शहरात 10 तर ग्रामीण भागात 2 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर पैठण येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात एकूण 65 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्हा व शहरात काय निर्बंध?

– जिल्ह्यात कोठेही विवाह समारंभ, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम मेळाव्यांसाठी मंगल कार्यालय, हॉलमध्ये 100 पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही.
– खुल्या जागेतील समारंभात 250 अथवा जास्त क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा अधिक लोक उपस्थित राहू शकणार नाहीत.
– क्रीडा स्पर्धांसाठी आयोजन स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती नसावी.
– सिनेमागृह, नाट्यगृहांतील प्रेक्षकांच्या संख्येवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल.
– तसेच जिव्ह्यात तसेच रात्री 9 ते सकाळी 6 वाजेदरम्यान जमावबंदी लागू राहील. या वेळेत 5 पेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर प्रतिबंध असतील.

इतर बातम्या-

उत्तर महाराष्ट्रातले मायाजालः 240 कोटींचे घबाड सापडले; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये छापे, 6 कोटींची रोकड, 5 कोटींचे दागिने जप्त

ट्रकसमोर बाईक आडवी घातली, कोयत्याच्या धाकाने चालकाला लुटलं, अल्पवयीन मुलासह दोघे जेरबंद