Aurangabad | औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे वारे आले… नि भर उन्हाळ्यात फळबागा फुलल्या, गुपित काय?

| Updated on: Apr 11, 2022 | 2:10 PM

ज्या दिवसात उष्णतेची तीव्र लाट आलेली होती, त्या दिवशी म्हणजे 2, 3 एप्रिल रोजी या जमिनीमध्ये आंब्याची मोठी झाडे लावण्याचे काम सुरू होते. मावेजा देताना फळझाडांचे मूल्यांकन अधिकचे येते. म्हणून फळझाडे लावली जातात.

Aurangabad | औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे वारे आले... नि भर उन्हाळ्यात फळबागा फुलल्या, गुपित काय?
औरंगाबाद पैठण रस्त्याच्या योजनेवर गेवराई तांडा वासियांचा सवाल
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबाद : बहुप्रतिक्षित औरंगाबाद-पैठण (Aurangabad Paithan) रस्त्याच्या चौपदरीकरणाची अधिसूचना निघाली. येत्या 24 एप्रिलला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनासाठी येणार आहेत. त्यामुळे एकिकडे सामान्य जनता आनंदी आहे तर बडे बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर आणि राजकारणीदेखील सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे या बड्या लोकांच्या जमिनींसाठी राष्ट्रीय महामार्गाची (National Highway) दिशा बद्दलल्याचा खटाटोप केलाय. काही बड्या लोकांच्या फायद्यासाठी हा रस्ता वळवल्याचा आरोप गेवराई तांडा येथील शेतकऱ्यांनी केला आहे. औरंगाबाद-पैठण मार्गावर सर्वात छोटे असलेल्या गेवराई तांडा गावासाठी बायपास देण्यात आलाय. तो बायपास गावातील एकाही शेतकऱ्याच्या जमिनीतून जाणार नाही. उलट धनदांडग्यांच्या आणि बड्या लोकांच्या जमिनींना लाभ देण्यासाठी हा खटाटोप केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या जमिनींवर फळबागा असल्याचे दाखवण्यासाठी भर उन्हाळ्यात पंधरा दिवसांपूर्वीच येथे मोठमोठी फळांची झाडंही लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गेवराई तांड्याला बायपास कशासाठी?

नवीन महामार्ग होण्याची कुणकूण लागताच धनदांडगे लोक जमिनी घेऊन ठेवतात, हे आजवर आपण ऐकले असेल. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर, उद्योजक आणि राजकारण्यांनी आधीच जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत. त्याच जमिनींमधून महामार्ग टाकण्याचा प्रकार घडला आहे. औरंगाबाद-पैठण या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. हे चौपदरीकरण करत असताना या रस्त्यावरील सर्वात छोटे असलेले गाव गेवराई तांड्याला चक्क बायपास करून तांड्याच्या पूर्वेला असलेल्या धनदांडग्यांच्या जमिनींमधून हा रस्ता घालण्याचे कारस्थान राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि कंन्सल्टंटने केले आहे. औरंगाबाद-पैठण रस्त्यावर गेवराई तांडा हे सर्वात छोटे गाव आहे. तरीही या गावाला पूर्वेकडून बायपास रस्ता (रिअलाईनमेंट) करण्यात येणार आहे. म्हणजे हे गाव आता हायवेवर नसेल. तर गेवराई तांडा गावापेक्षा मोठे असलेल्या गावांना मात्र, बायपास केलेले नाही. विशेष म्हणजे या गावात अतिक्रमणे नाहीत, वाहतूक कोंडी होणारे गाव नाही, फार गजबजलेलेही गाव नाही, तरीही या गावाला बायपास केले आहे.

स्थानिकांचा काय आरोप?

गेवराई तांडा गावाच्या पूर्वेला महामार्गाचे कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर, उद्योजक आणि राजकारण्यांच्या जमिनी आहेत. तर गावात सध्याच्या दोनपदरी रस्त्यालगत स्थानिक लोकांच्या जमिनी, प्लॉट आहेत. गावातून हा रस्ता टाकला असता तर स्थानिकच्या लोकांना भूसंपादनातून मावेजा मिळाला असता, राहिलेल्या जमिनींचा भाव वाढला असता, शिल्लक राहिलेल्या जागेचा व्यावसायिक वापर करता आला असता. मात्र, डीपीआर बनवताना गावातून रस्ता न टाकता गावाच्या पूर्वेला धनदांडग्यांच्या जमिनींमधून तो टाकण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

बायपासमुळे लांबी आणि खर्चही वाढणार

औरंगाबाद-पैठण हा रस्ता सध्या 100 फूट रुंद संपादित जागेत दोनपदरी आहे. आता चारपदरी करण्यासाठी अधिकची50० फूट जागा संपादित करायची आहे. मात्र, जिथे बायपास करायचे आहेत, तिथे पूर्ण 150 फूट रुंद जागा संपादित करावी लागणार आहे. गेवराई तांड्यामधून जाणारा सध्याचा रस्ता सरळ आहे. इथे बायपास केल्यास रस्त्याची लांबी एक किलोमीटरने वाढेल. तसेच बायपास करण्यासाठी 10 हेक्टर जमीन संपादित करावी लागेल तर बायपास न करता गेवराई तांड्यातूनच रस्ता पुढे नेल्यास अवघे १० हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. म्हणजे बायपासमुळे रस्त्याची लांबीही वाढणार आहे आणि पर्यायाने खर्चही वाढणार आहे.

पंधरा दिवसात फळबाग फुलली

धक्कादायक म्हणजे या रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत नोटिफिकेशन निघण्याच्या केवळ 15 दिवस आधी जमीन खरेदी करण्यात आली आहे. त्यापेक्षाही अधिक धक्कादायक म्हणजे भर उन्हाळ्यात आणि ऐन उष्णतेच्या लाटेत मोठमोठ्या आंब्याच्या फळझाडांची लागवड सुरू करण्यात आली आहे. कोणत्या गटातून हा रस्ता जाणार आहे, याची माहिती देणारे थ्री-ए नोटफिकेशन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने 24 एप्रिल रोजी प्रकाशित झाले. या नोटिफिकेशनच्या केवळ 15 दिवस आधी म्हणजे 8 मार्च 2022 रोजी रविंदरसिंग खुशबिरसिंग बिंद्रा, हरविंदरसिंग बसंतसिंग बिंद्रा, खुशबिरसिंग बसंतसिंग बिंद्रा, हरप्रितसिंग हरविंदरसिंग बिंद्रा, नरिंदरसिंग बसंतसिंग बिंद्रा, हरप्रितसिंग हरविंदरसिंग बिंद्रा, प्रब्ज्योतसिंग हरविंदरसिंग बिंद्रा यांनी गेवराई तांड्याच्या गट क्रमांक 93 मध्ये 2 कोटी 23 लाख 85 हजार रुपयांमध्ये 6 एकर दोन गुंठे शेतजमीन खरेदी केली. शिवाय राज्यात उष्णतेची तीव्र लाट आलेली होती, त्या दिवशी म्हणजे 2, 3 एप्रिल रोजी या जमिनीमध्ये आंब्याची मोठी झाडे लावण्याचे काम सुरू होते. मावेजा देताना फळझाडांचे मूल्यांकन अधिकचे येते. म्हणून फळझाडे लावली जातात.

इतर बातम्या-

Raigad VIDEO | वृद्धावर मधमाशांचा हल्ला, पोलिसाची चतुराई, फडकं सॅनिटायझरने पेटवून बचाव

Latur Market : सोयाबीनचे दर स्थिरावले, तुरीच्या दराने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली