देवेंद्र फडणवीसांचा थयथयाट 2029 पर्यंत सुरू राहील, शिवसेना खासदार विनायक राऊतांचं औरंगाबादेत वक्तव्य
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, गटापर्यंत खासदार-आमदारांचे दौरे आयोजित करण्यात आले आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यात 19 खासदार 4 दिवस जिल्हाभर फिरणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली
औरंगाबादः जनाब सेनाबद्दलचं देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांचं वक्तव्य निंदनीय असून आम्ही त्याचा धिक्कार करतो. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकाच्या यशामुळे देवेंद्र फडणवीसांचा थयथयाट होत असून 2029 पर्यंत तरी तो सुरुच राहील, असं वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी औरंगाबादमध्ये केलं. तसेच भाजपविरोधात लढण्यासाठी आम्हाला एमआयएमची गरज नाही, असंही खासदार राऊत यांनी औरंगाबादेत ठणकावून सांगितलं. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला नुकतीच सुरुवात झाली आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे खासदार आणि आमदार यांचे दौरे आयोजित करण्यात आले आहेत. याद्वारे महाविकास आघाडी सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवणे आणि पक्ष संघटन मजबूत करणे हा शिवसेनेचा उद्देश आहे. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, गटापर्यंत खासदार-आमदारांचे दौरे आयोजित करण्यात आले आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यात 19 खासदार 4 दिवस जिल्हाभर फिरणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली
काय म्हणाले विनायक राऊत?
औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर सणकून टीका केली. ते म्हणाले, ‘ फडणवीस यांचं जनाब सेना हे वक्तव्य निंदनीय आम्ही त्याचा धिक्कार करतो, बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी मिळाली त्यांच्या वाटेवर अडवाणी, वाजपेयी, प्रमोद महाजन चालत होते. नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी सुद्धा बाळासाहेब होते. त्यांचा जनाब या नावाने उल्लेख करून अवमान करणं हे पाप फडणवीस यांनी केलं, त्यांचं हे वाक्य क्षम्य नाही. त्यामुळे आम्ही फडणवीस यांचा धिक्कार करतो. देवेंद्र फडणवीस यांना आता देवेंद्र मिय्या असं म्हटलं पाहिजे, असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला.
‘एमआयएमची पिलावळ महाविकास आघाडीत सोडण्याचा प्रयत्न’
MIM ने महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव देणे हे भाजपचेच कट कारस्थान आहे, असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केली. ते म्हणाले, ‘ भाजपच्या कपटनीतीचा प्रयोग म्हणून एमआयएमची पिलावळ महविकास आघाडीत सोडण्याचा प्रयत्न केला आहे. एमआयएम कसा वापर भाजपने केला आहे हे, सगळ्यांना माहीत आहे, ज्या एमआयएमचे नातं औरंगजेबच्या थडग्यासोबत आहे त्यांना महाविकास आघाडीत कधीही थारा मिळणार नाही, असेही विनायक राऊत म्हणाले.
इतर बातम्या-