Chandrakant Khaire : ‘ज्या दिघेंच्या आशीर्वादानं मोठा झाला, त्यांनाच विसरला’; चंद्रकांत खैरेंची औरंगाबादेत एकनाथ शिंदेवर घणाघाती टीका

| Updated on: Jul 22, 2022 | 8:37 PM

1985पासून संघर्ष केला, धर्मांधांच्या गल्लीत जाऊन त्यांना मारले, असे म्हणत बंडखोरांना इशारा दिला आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेची कार्यकारिणी खरी नाही. उद्धव ठाकरे यांची कार्यकारिणी खरी आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

Chandrakant Khaire : ज्या दिघेंच्या आशीर्वादानं मोठा झाला, त्यांनाच विसरला; चंद्रकांत खैरेंची औरंगाबादेत एकनाथ शिंदेवर घणाघाती टीका
चंद्रकांत खैरे
Follow us on

औरंगाबाद : ज्या धर्मवीर आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मोठा झाला त्यांनाच विसरला, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. बंडखोरांचा बालेकिल्ला म्हणवल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खैरे यांनी शिवसेनेतील बंडखोरांवर तसेच भाजपावर टीका केली. ते म्हणाले, की अमित शहा आले, तेव्हा मी त्या बैठकीला होतो. आदित्य ठाकरेदेखील (Aditya Thackeray) होते. अमित शाह आले आणि अडीच-अडीच वर्षे ठरली. पण नंतर पाच वर्षे आम्हालाच म्हणाले, अशी टीका खैरे यांनी भाजपावर केली. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व नको म्हणून भाजपाने अनेक भानगडी केल्या, असा आरोपदेखील खैरे यांनी केला. ओबीसी आरक्षणाचा निर्णय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला आणि हे भाजपावले ढोल ताशे वाजवू लागले आहेत, असे खैरे म्हणाले.

‘सत्तार हिरवा साप’

आता या दाढीने आनंद दिघे यांच्यावर सिनेमा काढला. मी त्या दाढीशी खेटतो. तू काय माझ्याशी खेटतो, उद्धव साहेबांचा वाढदिवस झाला की, आपल्याला सुरू करायचे आहे, असे खैरे म्हणाले. संदीपान भुमरेला मी आमदार निवासमध्ये कोंडून ठेवले, तिकीट दिले आणि आमदार केले. आता त्यांनी गद्दारी केली, असा आरोप त्यांनी केला. अब्दुल सत्तारांवर टीका करताना ते म्हणाले, की हा हिरवा साप सारड्यासारखा रंग बदलतो. आम्ही सिल्लोडमध्ये मोठी सभा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आनंद दिघेंच्या सिनेमामध्ये दाखवले गेले आहे, की गद्दारांना माफी नाही आणि आता मी या गद्दारांना सांगतो अजून आम्ही जिवंत आहोत.

हे सुद्धा वाचा

बंडखोरांना इशारा

1985पासून संघर्ष केला, धर्मांधांच्या गल्लीत जाऊन त्यांना मारले, असे म्हणत बंडखोरांना इशारा दिला आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेची कार्यकारिणी खरी नाही. उद्धव ठाकरे यांची कार्यकारिणी खरी आहे, असेही खैरे यांनी सांगितले. 1988च्या नंतर एका रिक्षावल्याकडे इतके पैसे कुठून आले, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यामागे ईडी का नाही लागली? आमच्या छोट्या-मोठ्या आमदारांच्या मागे ईडी लागली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.