Weather Forecast : सकाळी गुलाबी थंडी, दुपारी ऑक्टोबर हीटचे चटके, अलमारीतून स्वेटर बाहेर निघाले

| Updated on: Oct 20, 2021 | 3:42 PM

येत्या आठवड्यात किमान तापमान 19 ते 20 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर 25 ऑक्टोबरपर्यंत कमाल तापमानात 33 अंश सेल्सियसपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Weather Forecast : सकाळी गुलाबी थंडी, दुपारी ऑक्टोबर हीटचे चटके, अलमारीतून स्वेटर बाहेर निघाले
औरंगाबादेत दुपारी तापमानाचा पारा 32 अंशांवर
Follow us on

औरंगाबाद: मान्सून परतल्यानंतर आता हवामानात वेगाने बदल होत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांतच औरंगाबाद शहरातील (Winter in Aurangabad) नागरिकांना चांगलेच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. ही ऑक्टोबर हीटची सुरुवात असून येत्या आठवड्यात तापमान 33 अंशांच्या पार जाण्याचा अंदाज (Weather forecast ) आहे. सकाळच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या औरंगाबादकरांना हलक्याशा थंडीची जाणीव होत आहे. तर दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहेत. सकाळच्या थंडीमुळे आता अनेक घरांच्या अलमारीत ठेवलेले स्वेटरही बाहेर निघू लागलेत.

बुधवारचे तापमान किती?

औरंगाबाद शहरातील बुधवारचे किमान तापमान 17 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सियस एवढे नोंदले गेले. रात्रीच्या वेळी तापमानात चांगलीच घट झालेली दिसत आहे. दरम्यान येत्या आठवड्यात कमाल तापमानातही वाढ होणार असल्याने शहरवासियांना उन्हाचे तीव्र चटके बसण्याची शक्यता आहे.

किमान तापमान 19 अंशांपर्यंत

येत्या आठवड्यात किमान तापमान 19 ते 20 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर 25 ऑक्टोबरपर्यंत कमाल तापमानात 33 अंश सेल्सियसपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजूनही काही ठिकाणी ढगांची चादर

हवामान बदलांमुळे मान्सून परतल्यानंतरही औरंगाबादमधील काही भागांवर ढगांची चादर आहे. मात्र एकंदरीत मराठवाड्याचे तापमान वाढायला आता सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसानंतर साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून किमान तापमान कमी होण्यास सुरुवात होते. याच कालावधीत दिवसभर उन्हाचा कहर तर पहाटे व सूर्यास्तानंतर थंड वारे वाहण्यास सुरुवात गोतके. या प्रकारचे वातावरण शहरात तयार होत असून येत्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 2 लाख 25 हजार पिकविम्याच्या तक्रारी

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 26 लाख 74 हजार 200 शेतकऱ्यांनी पीक विम्याबाबत नुकसानीच्या तक्रारी केल्या आहेत. त्यात 17 लाख 38 हजार 995 शेतकऱ्यांच्या शेतातील सर्वेक्षण झाले. पिकाच्या विम्यानुसार 100 टक्के रक्कम मिळाल्यास साधारणत: 11 हजार 365 कोटी मराठवाड्याला मिळू शकतात.
यंदा पीक विमा कंपनीकडे तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वाधिक अडचणी आल्या. पीक विमा कंपनीला नुकसानीच्या 72 तासांत तक्रार करणे गरजेचे होते. मात्र कंपन्यांचे फोन लागत नव्हते. तसेच या कंपन्यांचे कुठेही कार्यालय नसल्यामुळे शेतकऱ्यांना संपर्क कुठे करावा? ही देखील अडचण निर्माण झाली होती. तसेच कृषी महसूल विभागाकडूनही सुरुवातीच्या टप्प्यात फारसा आढावा न घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात 2 लाख 25 हजार 270 शेतकऱ्यांनी पीक विम्याबाबत तक्रारी दाखल केल्या. कृषी विभाग, पीक विमा कंपनी यांच्या माध्यमातून सर्वेक्षण पंचनामे करण्यात येत असल्याचे औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या-

शेतकऱ्यांचे तर्क-वितर्क ; मात्र, अद्यापही विमा नुकसान भरपाईचे घोडे अडलेलेच ; काय आहे वास्तव ?

पीक नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा ; दिवाळीच्या आगोदर की नंतर ?