महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढवणारी मोठी बातमी, आता नव्या घोटाळ्याचा आरोप

महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आता आणखी एका नव्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आरोपांप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता सत्तार यांच्याविरोधात कारवाई होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढवणारी मोठी बातमी, आता नव्या घोटाळ्याचा आरोप
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 21, 2023 | 5:08 PM

औरंगाबाद : महाराष्ट्राचे विद्यमान कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केल्याची बातमी ताजी असताना त्यांच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलेला. त्यानंतर आता पुन्हा एका घोटाळ्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांनी मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी थेट नदी खोदल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अब्दुल सत्तार यांनी नदी खोदून वाळू उपसली, अशी तक्रार कोट नांद्रा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केली आहे. सरपंचांनी सत्तार यांच्याविरोधात विभागीय आयुक्तालयात तक्रार केली आहे. माणिकराव निकम असं तक्रार करणाऱ्या सरपंचांचं नाव आहे. त्यांच्या या आरोपांप्रकरणी सत्तार यांच्याकडून काय स्पष्टीकरण देण्यात येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच या प्रकरणी विभागीय आयुक्तांकडून तक्रारीची दखल घेऊन काही कारवाई केली जाते का? हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सरपंचांनी केलेल्या तक्रारीत नेमके आरोप काय?

“कोर्ट नांद्रा गावात पूर्णा नदी आहे. या पूर्णा नदीत 5000 ब्रास वाळू उचलण्याचं टेंडर सिल्लोड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने निघालं होतं. मात्र त्याठिकाणी 5000 ब्रास ऐकजी तब्बल 1 लाख ब्रास वाळू उपसण्यात आली. त्यासाठी थेट नदी खोदण्यात आली”, असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय.

“वाळू उपसा करताना साडेतीन फुटापर्यंत खोल नदी खोदण्याची परवानगी देण्यात आली होती. पण 10 ते 15 फूट खोल नदी खोदण्यात आली आहे”, असाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात अब्दुल सत्तार आणि सिल्लोड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अब्दुल सत्तार वारंवार अडचणीत

अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून वारंवार विरोधकांच्या टार्गेटवर येत आहेत. त्यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करण्यात येत आहेत. कृषी विभागाकडून बोगस खतांविरोधात करण्यात आलेल्या धाडसत्रच्या कारवाईवरुनही अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. या प्रकरणामुळे सुद्धा ते अडचणीत आले होते.

अब्दुल सत्तार वारंवार काही ना काही कारणास्तव चर्चेत येत असतात. कधी त्यांनी महिला लोकप्रतिनिधीला शिवीगाळ केली म्हणून ते विरोधकांच्या टीकेचे धनी बनतात. तर कधी त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यांचा आरोप होतो. सत्तार यांच्या राजीेनाम्याची देखील मागणी विरोधकांकडून केली जाते. पण मुख्यमंत्र्यांकडून अद्याप त्यांचा राजीनामा मागण्यात आलेला नाही.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. आपण कुत्र्याच्या चिन्हावरही निवडणुकीत जिंकून येऊ शकतो, असा दावा सत्तार यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुनही त्यांच्यावर टीका झाली होती.