Aurangabad: जिल्ह्यात 128 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची तयारी, 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाला सुरुवात

| Updated on: Nov 25, 2021 | 6:11 PM

कोरोना प्रादुर्भावामुळे औरंगाबादमधील ग्रामपंचायत पोटनिवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र आता निवडणूका घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील सविस्तर कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे.

Aurangabad: जिल्ह्यात 128 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची तयारी, 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाला सुरुवात
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली होती. सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून जिल्ह्यातील 128 ग्रामपंचातयींच्या रिक्त 185 जागांसाठी येत्या 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व तहसील कार्यालयांमध्ये निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

6 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत

निवडणूक कार्यक्रमानुसार, 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर 7 डिसेंबरला सकाळी 11 वाजता दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर 9 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मुदत देण्यात आली आहे. तर त्याच दिवशी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीची वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार निश्चित करतील, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद तालुक्यात 26 जागा रिक्त

जिल्ह्यातील तालुकानिहाय रिक्त जागा पाहिल्यास औरंगाबादमध्ये वीस ग्रामपंचायतीत 26 जागा रिक्त आहेत. तर पैठणमध्ये 14 ग्रामपंचायतीत 17 जागा रिक्त आहेत. अशा प्रकारे फुलंब्रीत 20, वैजापूरमध्ये 29, गंगापूरमध्ये 20, कन्नडमध्ये 21, खुलताबादमध्ये 19, सिल्लोडमध्ये 21 तर सोयगावात 12 जागांवर पोटनिवडणूका घेण्यात येतील.

इतर बातम्या-

ठरलं! राज्याचं हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबरला मुंबईतच होणार- सूत्र

शेतकऱ्यांनो अन्नदाता तर आहातच पण आता उर्जा दाताही व्हा : मंत्री नितीन गडकरी