हा आमचा विकास नव्हे, आमचा विकास अजून दिसायचा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यासाठी 8 मोठ्या घोषणा

| Updated on: Sep 17, 2021 | 9:37 AM

मुख्यमंत्र्यांचा हा औरंगाबादेतील दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही मुख्यमंत्र्यांच्या विरोध केलाय. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना दौऱ्याला विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं पाणी पुरवठा योजनेत औरंगाबादकरांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेनं केलाय

हा आमचा विकास नव्हे, आमचा विकास अजून दिसायचा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यासाठी 8 मोठ्या घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद दौऱ्यात मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केल्यानंतर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा केली. तसंच निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्यासाठी योजनांचा पाढा वाचवून दाखवत मुख्यमंत्र्यांनी एमआयएमला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

आज ज्याने ज्याने मला धन्यवाद म्हणून बोर्ड दाखवले, त्यांना मला सांगायचं आहे की आमचा विकास आता सुरु झाला आहे, आणि अजून खूप होणार आहे. बोलघेवडे सरकार काही कामाचं नसतं, अशा कानपिचक्याही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावल्या.

मुख्यमंत्र्यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या?

– मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा
– निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार
– औरंगाबाद आणि अहमदनगर रेल्वेने जोडण्याचं मुख्यमंत्र्यांचं रेल्वे राज्यमंत्र्यांना आवाहन
– औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना
– मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणार
– घृष्णेश्वर सभामंडप
– औरंगाबादचे पर्यटन समृद्ध करणार
– परभणीत शासकीय महाविद्यालय

उद्धव ठाकरे सकाळी 7.30 वाजता मुंबईहून विमानाने औरंगाबादकडे रवाना झाले. सकाळी 8.25 वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळ आगमन झालं. सकाळी 9 वाजता मुख्यमंत्र्यांनी सिद्धार्थ उद्यान येथे स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तीसंग्रामातील हुताम्यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री सकाळी 10.40 वाजता शेंद्रा येथील ऑरिक सिटी आणि डीएमआयसी अंतर्गतच्या विविध कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता ते चिकलठाणा विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचं उपहासात्मक स्वागत करण्यासाठी एमआयएमचे कार्यकर्ते रस्त्यावर

बाबा चौक परिसरात शेकडो एमआयएम कार्यकर्ते एकत्र आले आहेत. हातात स्वागताचे फलक घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर जमा झाले आहेत. बाबा चौकात स्वागतासाठी चारही बाजूने कार्यकर्ते उभे आहेत. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

एमआयएमच्या दोन नगरसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

औरंगाबाद विमानतळाबाहेरून एमआयएमच्या आंदोलनकर्त्या दोन नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  उद्धव ठाकरे यांच्या एमआयएमकडून होणाऱ्या उपहासात्मक पद्धतीच्या स्वागतास पोलिसांनी मनाई केली आहे.

शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरातील विमानतळ, बाबा पेट्रोलपंप, सिद्धार्थ उद्यान, जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत आदी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. या दिवशी विविध राजकीय पक्षही आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पोलीस दलानेही काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेशी खबरदारी घेतलेली आहे.

दो गज की दूरी…मास्क है जरूरी

EP मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन करतील. सकाळी 9.25 वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कार्यक्रम स्थळी 400 च्या जवळपास खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या किंवा आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच या कार्यक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे. वीस हजार चौरस फुटाच्या मंडपाची उभारणी केली असली तरी 200 लोकांनाच कार्यक्रमात उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे.

राजकीय पक्षही आक्रमक

मुख्यमंत्र्यांचा हा औरंगाबादेतील दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही मुख्यमंत्र्यांच्या विरोध केलाय. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना दौऱ्याला विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं पाणी पुरवठा योजनेत औरंगाबादकरांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेनं केलाय. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे शिवसेनेने शहरात केलेल्या सो कॉल्ड विकासकामांसाठी उपरोधिक पद्धतीने धन्यवाद आंदोलन करतील.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ते पुष्पवृष्टी करतील तसेच त्यांच्या आगमनाला तुतारीही वाजवली जाईल.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे यांचा ताफा औरंगाबादमध्ये अडवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा कोणत्याही परिस्थितीत अडवण्याचा निर्णय घेतल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. खासदार संभाजीराचे छत्रपती यांना राज्य सरकारानं दिलेली आश्वासन पूर्ण केली नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

LIVE UPDATE | मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा, निजामकालीन शाळांचा पुनर्विकास करणार

74 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळ्यासाठी औरंगाबाद सज्ज, पोलिसांचे संचलन