विजयाच्या उंबरठ्यावर असूनही मनात खंत, विक्रम काळे यांना नेमकी कोणती गोष्ट मनाला टोचतेय?

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या एकूण पाच जागांच्या निवडणुकीचा निकाल (Maharashtra MLC Election Result 2023) आज समोर येतोय.

विजयाच्या उंबरठ्यावर असूनही मनात खंत, विक्रम काळे यांना नेमकी कोणती गोष्ट मनाला टोचतेय?
| Edited By: Chetan Patil | Updated on: Feb 02, 2023 | 4:56 PM

औरंगाबाद : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या एकूण पाच जागांच्या निवडणुकीचा निकाल (Maharashtra MLC Election Result 2023) आज समोर येतोय. यामध्ये औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे (Vikram Kale) हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती समोर येतेय. विक्रम काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अधिकृत उमेदवार आहेत. त्यांना महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) घटक पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. परिणामी औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीची तिन्ही पक्षांनी लावलेली ताकद आता कामी येताना दिसत आहे. विक्रम काळे यांची आता कधीही विजयी उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. विक्रम काळे यांना 20 हजार 79 मतं मिळाले आहेत. दुसरीकडे भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना 13 हजार 489 मतांवर आहेत. विक्रम काळे यांनी निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विक्रम काळे हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. पण तरीही ते द्वंद्व मनस्थितीत दिसत आहेत. आपण पहिल्याच फेरीमध्ये निवडून येणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे ते अस्वस्थ असल्याचं त्यांनी स्वत: सांगितलं आहे.

“निकाल असा अपेक्षित होता की आपण पहिल्या फेरीमध्येच विजयी होऊ. पहिल्या पसंतीच्या मतामध्ये विजयी होऊ. पण संघटना आणि भाजप दोघांना सारखी मतं मिळाली आहेत. त्यांच्यात फार तफावत वाटत नाही. त्यामुळे थोडीशी खंत वाटतेय”, अशी भावना विक्रम काळे यांनी व्यक्त केली.

“शेवटी जो जिता वही सिकंदर असतो. मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी आता दुसऱ्या पसंतीची मतं मोजावी लागत आहेत. त्यासाठी प्रोसेस सुरु झाली आहे. जे काही इतर उमेदवार आहेत त्यामध्ये मला दोन क्रमाकाची मतं मिळतील. मी कोटा पूर्ण करेन, असा मला आत्मविश्वास आहे”, असं विक्रम काळे म्हणाले.

‘भाजपने पैसे देवून उमेदवार उभे केले’

“मला हरवण्यासाठी भाजप व इतरांनी पैसे देऊन उमेदवार उभे केले मात्र माझा विजय निश्चित आहे”, असंदेखील विक्रम काळे यावेळी म्हणाले.

“मतांचं विभाजन झालं. जुनी पेन्शन योजना, शंभर टक्के विना अनुदान शाळांना अनुदान मिळवून देणे हे दोन महत्त्वाचे विषय होते. त्या मुद्द्यावरुन मतांचं विभाजन झालेलं दिसतंय’, असं विक्रम काळे यांनी सांगितलं.

‘मी आनंदीच आहे, पण…’

“मी पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं, विक्रम काळे यांना टार्गेट करण्यासाठी सगळ्यांनी जाणीवपूर्वक उमेदवार उभे केलेले होते. त्यामध्ये अर्थपूर्ण उमेदवार उभे केले होते. त्यामुळे ते किती मतं घेणार याचा मला पहिल्या दिवसापासून अभ्यास होता. मी यावर लक्ष ठेवून माझ्या परिने काम करत होतो”, अशी प्रतिक्रिया काळे यांनी दिली.

“माझी विजयाकडे वाटचाल आहे. मी आनंदीच आहे. पण आता निकालापर्यंत वाट पाहणे जरुरीचं आहे. एक मुरलेला उमेदवार, तीन टर्मचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे अतिउत्साह किंवा उतावीळ होऊन चालत नाही. संयमाने सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. त्यामुळे मी संयमानेच वागतोय”, असं ते म्हणाले.

“विजय हा दृष्टीक्षेपात आहे. पुढच्या काळात विना अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मिळवून देणं आणि शिक्षक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळवून देणं हे माझं लक्ष्य आहे”, असं विक्रम काळे यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us