मी मरावं वाटतं का तुम्हाला? उपोषणस्थळी आई येताच मनोज जरांगे कार्यकर्त्यांवर डाफरले

आम्ही आंदोलनाचे काही टप्पे पाडले आहेत. किती टप्पे पाडले हे आम्हाला माहीत आहे. आमच्या पद्धतीने आंदोलन करणार. ते सुरू आहे. यायचं असेल तर या नाही तर नका येऊ. तुम्ही भेटायला आला तर स्वागत करू. तुम्हाला संरक्षण देऊ. पण आज किंवा उद्याच या. नंतर माझं बोलणं बंद झाल्यावर येऊन काय फायदा? त्यानंतर आला तर तुम्हाला मराठे बेजार करतील. रट्टा देतील, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मी मरावं वाटतं का तुम्हाला? उपोषणस्थळी आई येताच मनोज जरांगे कार्यकर्त्यांवर डाफरले
Manoj Jarange Patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2023 | 4:39 PM

संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 29 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. पाच दिवस पोटात अन्नाचा कण नाही आणि पाणीही घेतलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील अशक्त झाले आहेत. त्यांना बोलताना त्रास होत आहे. त्यामुळे त्यांनी कुटुंबांना आंदोलन स्थळी आणू नये अशी विनंती केली आहे. कुटुंबाला पाहून हुंदका अनावर होतो. त्याचा शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे उपोषणावरही परिणाम होतो, असं जरांगे पाटील सांगत आहेत. जरांगे यांच्या या आवाहनानंतरही त्यांच्या आईला आंदोलन स्थळी आणण्यात आलं. त्यामुळे ते अधिकच भडकले. त्यांनी आईला आणणाऱ्यांना चांगलंच फटकारलं.

अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. सलग पाच दिवस अन्नपाण्याला हात न लावल्याने मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना बोलण्यासही त्रास होत आहे. ते अधिकवेळ बसू शकत नाहीत. त्यामुळे ते स्टेजवर झोपूनच राहतात. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असल्याने त्यांना भेटायला त्यांची आई प्रभावती या आल्या. पण आईला पाहून मनोज जरांगे कार्यकर्त्यांवर चांगलेच डाफरले. त्यांनी भर स्टेजवर कार्यकर्त्यांना सुनावलं.

व्हय खाली चल. व्हय खाली

कशाला आणलं आईला? कोण आणतं रे त्यांना? तुम्हाला कोण आणायला सांगतं त्यांना? इकडे ये… इकडे ये. कोण आणायला सांगतं रे तुम्हाला? कोण बाबा? तुम्हाला अकली नाहीत का? कुटुंब पाहिल्यावर मला त्रास होतो. काय ऐकायचं तुहं? व्हय खाली चल. व्हय खाली, असं असा संताप जरांगे यांनी व्यक्त केला.

मला किती त्रास होतोय…

मला किती त्रास होतोय कळत नाही तुम्हाला? प्रत्येक वेळेस कुटुंब घेऊन येता इथं. तुमचं शहाणपण ऐकायचं का? मला त्रास होत नाही का? मी मरावं वाटतं का तुम्हाला? नालायक आहे का रे तू? सारखं सारखं प्रश्नांची उत्तरं देतो. कुटुंब आणल्यावर मला त्रास होतो. पार जिवाला लागतं माझ्या. तुम्ही बार बार कुटुंब आणून बसविता इथं, असंही ते म्हणाले.

मग आंदोलन थांबेल

यावेळी त्यांनी शिंदे समितीवरही भाष्य केलं. समितीचा आणि आमचा काही संबंध नाही. त्यांना एक पुरावा सापडला तरी आरक्षण देता येतं. मराठ्यांना वेड्यात काढू नका. तुम्ही समितीला 50 वर्षाची मुदत दिली तरी आम्ही ऐकणार नाही. आम्ही आंदोलनाची किती टप्पे पडले आम्हाला माहीत आहे. एक एक टप्प्यात काय करणार हे आम्हाला माहीत आहे. शेवटी सरकारला कुणाच्या तरी हातात जीआर द्यावाच लागणार आहे. अशी परिस्थिती येईली की सरकारला इथे येताच येणार नाही. कुणाकडे तरी जीआर द्यावा लागेल. मग हे आंदोलन थांबेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us