Manoj Jarange : मुंबईत पोरांना त्रास झाला, तर जिल्ह्याजिल्ह्यात… मनोज जरांगेंचा प्लान बी ठरला; काय दिल्या थेट सूचना?
मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील मोर्च्यासोबतच मराठा आरक्षणासाठी 'प्लान बी' तयार केला आहे. मुंबईत आंदोलकांना त्रास झाल्यास जिल्ह्याजिल्ह्यात शांततापूर्ण ठिय्या आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले. उद्याच्या बैठकीत मोर्चाची तारीख व मार्ग निश्चित होईल. आर्थिक अडचणी असलेल्यांनी गावातच राहून परिस्थितीनुसार रस्त्यावर उतरावे, असेही जरांगे पाटलांनी सुचवले आहे.

अंतरवलीत उद्या शनिवारी मराठा समाजाची बैठक होणार आहे. उद्याच्या बैठकीत मुंबईला जाण्याची तारीख आणि मार्ग सांगितला जाणार आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने मुंबईला यायचं आहे. पण ज्यांना शक्यच होणार नाही. त्यांनी गावं सांभाळायची आहे. मुंबईत गेल्यावर आम्हाला, पोरांना, कुणाला काही त्रास झाल्यास जिल्ह्याजिल्ह्यात रस्त्यावर उतरायचं आहे. नाक दाबल्या शिवाय या सरकारचं तोंड उघडणारच नाही, असं आवाहनच मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. जरांगे पाटील हे मुंबईला मोर्चा घेऊन जात आहे. मात्र, त्यांनी त्यांचा प्लान बीही तयार केल्याची या निमित्ताने चर्चा सुरू झाली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. उद्या होणाऱ्या बैठकीची माहिती देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईला येण्याचं आवाहन करतानाच गाव पातळीवरही आंदोलन करण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं आहे. मुंबईत पोरं गेल्यावर त्यांना त्रास झाला तर कामाकडे पाहू नका. सर्व तालुक्यातील लोकांनी एकत्र येऊन एका जागेवर शांततेत ठिय्या मारून बसा. राज्य बंद होऊ द्या, नाही तर काही होवो, आपल्याला काही घेणं नाही. सर्वांनी शांततेत ठिय्या आंदोलन करायचं आहे. एका एका तालुक्यात आपण लाखापेक्षा कमी नाहीये. यांचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. त्यामुळे सर्वजणांनी एकजीवाने तेवढं काम करा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
शांततेत आंदोलन करा
सध्या पाऊस नाहीये. अडीअडचणीचे दिवस आहेत. पैशाच्या अडचणी असतील तर तुम्ही येऊ नका. तुम्ही गावं सांभाळली तरी खूप झालं. दिवस संकटाचे आहेत. इकडेही आरक्षण हवं आहेत. पाऊस पाणी नसल्याने तिकडेही संकट आहे. त्यामुळे ज्यांना अडीअडचणी असतील त्यांनी गावात राहायचं आहे. आम्हाला मुंबईत काही त्रास झाला तर इकडे जिल्ह्याजिल्ह्यात रस्त्यावर उतरा. शांततेत आंदोलन केलं तरी खूप झालं, असं जरांगे म्हणाले.
तुम्हाला जसं शक्य असेल तसं…
सर्व गावकऱ्यांनी वर्गणी करून गाड्या लावायच्या आहेत. गावकऱ्यांनी आंदोलकांना जाताना शिदोरी द्यायची आहे. याबाबत उद्या सविस्तर सांगणारच आहे. मुंबईला जाणाऱ्यांना वाहनं आणि शिदोरी देण्याची जबाबदारी एखाद्यावर टाकणं योग्य होणार नाही. पाऊसपाणी नसल्याने प्रत्येकाने जबाबदारी उचलायची आहे. त्यामुळे गावानेच वर्गणी काढून सामुहिकरित्या मदत करायची आहे. एखाद्या व्यक्तीला आर्थिक अडचण असू शकते. पण गावापुढे संकट नसतं. गावाने मिळून वर्गणी केली तर जाऊन येईपर्यंत पुरेल एवढी वर्गणी गोळा होऊ शकते. पोरांना थोडं थोडं खायला करून दिलं तरी त्यांची सोय लागेल. हे सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला जसं शक्य असेल तसं करा, असं त्यांनी म्हटलंय.
आशीर्वाद द्यायला या
मुंबईला जे येणारे नाहीत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक घरातील सहकुटुंबाने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मुंबईला जाण्याच्या मार्गावर यायचं आहे. काम बुडालं तरी चालेल, व्यवसाय बुडाला तरी चालेल, दांडी मारली तरी चालेल. पण आशीर्वाद द्यायला या. कारणं देऊ नका. मुंबईला जायचा मार्ग तुमच्या घरापासून 100-200 किलोमीटर दूर असला तरी चालेल. पण तुम्ही या. तुमचा आशीर्वाद जरुरी आहे. आमच्या गावापासून मार्ग लांब आहे, हा विचार करू नका. तुम्ही आशीर्वाद द्यायला आल्यावर समाजातील शेकडो पिढ्यांचं कल्याण होणार आहे, असंही ते म्हणाले.