IND vs AFG मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी चिंताजनक बातमी समोर, खेळाडूंसमोर मोठे प्रश्न
IND vs AFG T20: भारत अफगाणिस्तान टी-२० मालिका सुरु होणार असून त्याआधीच भारतीय संघाच्या सुरक्षेविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिका सुरु होण्यापूर्वीच चर्चा सुरु झाली आहे. दिल्ली पोलिसांनी ब्रिक्स शिखर परिषदेमुळे मालिकेतील पहिला सामना पुढे ढकलण्याची विनंती डीडीसीएला केली आणि आता भारतीय संघाच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे वृत्त समोर येत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, गुरुवारी जेव्हा भारतीय संघाचे खेळाडू सरावासाठी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पोहोचले, तेव्हा त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक नव्हते. सरावानंतर हॉटेलमध्ये परतल्यावरही असेच घडले. यामुळे भारतीय संघाच्या सुरक्षेविषयी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
भारतीय संघाच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा दावा एका पत्रकाराने केला आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले की, गुरुवारी जेव्हा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला सराव केला, तेव्हा त्यांच्या आगमनावेळी आणि प्रस्थानावेळी कोणताही सुरक्षा अधिकारी उपस्थित नव्हता. अंकन कर यांनी सोशल मीडियावर लिहिले, “अरुण जेटली स्टेडियमवर सराव सत्रासाठी येताना आणि जाताना भारतीय संघासोबत कोणतेही सुरक्षा कर्मचारी किंवा एस्कॉर्ट वाहने नव्हती.” भारतीय आणि अफगाणिस्तान संघांना सुरक्षेतील त्रुटींचा सामना करावा लागू शकतो, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी डीडीसीएला आधीच दिली होती. संघांना सहसा हॉटेलपासून स्टेडियमपर्यंत सोबत करण्यासाठी पोलिसांच्या ताफ्याव्यतिरिक्त एस्कॉर्ट गाड्याही मिळतात.
View this post on Instagram
यापूर्वी, दिल्ली पोलिसांच्या ईमेलनंतर भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेत बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु डीडीसीएने (DDCA) हे वृत्त फेटाळून लावले आहे. डीडीसीएच्या म्हणण्यानुसार, ही मालिका नियोजित वेळेनुसारच होईल. तिन्ही सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळले जातील. भारतीय संघ यजमान म्हणून खेळणार आहे. या मालिकेसाठी दिल्लीतील स्टेडियम अफगाणिस्तानचे घरचे मैदान असेल. तिन्ही टी-२० सामने १३, १५ आणि १७ सप्टेंबर रोजी खेळले जातील.
भारतीय संघाच्या टी-२० कामगिरीवर सगळ्यांचे लक्ष असणार आहे कारण मागील काही महिन्यात कामगिरी ढासळताना दिसत आहे. भारतीय संघातील वैभव सूर्यवंशीकडे विशेष लक्ष असणार आहे.
