Aurangabad: जिल्ह्यात 130 कोटींच्या निधीचा वापर, 365 कोटींची कामे अपेक्षित, वाचा पालकमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या?

| Updated on: Oct 09, 2021 | 3:35 PM

चालू वार्षिक नियोजनात औरंगाबाद जिल्ह्यात 365 कोटी रुपयांची कामे अपेक्षित आहेत. यापैकी केवळ 130 कोटी रुपये खर्च झाल्याचेही बैठकीत समोर आले.

Aurangabad: जिल्ह्यात 130 कोटींच्या निधीचा वापर, 365 कोटींची कामे अपेक्षित, वाचा पालकमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या?
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतीच औरंगाबादेत बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला.
Follow us on

औरंगाबाद: शहरात जिल्ह्याचे (Aurangabad District) पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी नुकतीच जिल्हा विकास समितीची बैठक घेतली. या बैठकीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain in Aurangabad)  जिल्हाभरातील शेतीचे नुकसान झाले आहे, त्याच्या अहवालांचा आढावा घेतला. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 569 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे सुरू आहेत. हे काम पूर्ण झाल्यावरच मदत मिळेल, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. दरम्यान, चालू वार्षिक नियोजनात जिल्ह्यात 365 कोटी रुपयांची कामे अपेक्षित आहेत. यापैकी केवळ 130 कोटी रुपये खर्च झाल्याचेही बैठकीत समोर आले. या बैठकीस रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre), महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत आदींची उपस्थिती होती

विहीर खोदण्यासाठी पाठपुरावा करू- संदिपान भुमरे

रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी बैठकीत औरंगाबाद आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे विहिरी वाहून गेल्याचा मुद्दा मांडला. अशा शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून पुन्हा विहीर खोदण्यासाठी पाठपुरावा करू, असे भुमरेंनी सांगितले. मराठवाडा मुक्तिसंग्रामाला पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होणार असल्याने अमृतमहोत्सव साजरा करावा, अशी विनंती आमदार अंबादास दानवे यांनी केली.
स्वामीत्व योजनेअंतर्गत गावठाणातील लाभार्थींना सनदीचे वाटप पालकमंत्र्यांचे हस्ते झाले. या वेळी संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, सुनील चव्हाण, मीना शेळके यांची उपस्थिती होती.

संतपीठाला विद्यापीठाने समाजाभिमुख करावे- देसाई

संतपीठाच्या माध्यमातून समाजात विविध संप्रद्रायातील संस्कृती आणि संताची  शिकवण समाजापर्यंत पोहचवून सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व घडवण्याबरोबरच रोजगार निर्मित्तीसाठी आवश्यक असलेल्या विविध अभ्यासक्रम सुरु करण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. संतपीठाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संतपीठ हे समाजाभिमूख  करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत केले.

पालकमंत्र्यांनी आणखी कोणत्या घोषणा केल्या?

– जिल्ह्यातील धोकादायक तलाव दुरुस्तीसाठी २० लाखांचा निधी मिळेल.
– जिल्ह्यातील सहा तीर्थक्षेत्रांचा दर्जा वाढवून त्यांना ‘क’ दर्जा बहाल.
– नारेगाव येथील क्रीडा संकुलाचे काम लवकर सुरू करणार.
– पडझड झालेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी देणार.
– आयुष रुग्णालय होणार. त्यासाठी जागा निश्चिती झाली.
– संत एकनाथ रंगमंदिरासाठी अडीच कोटी रुपये तत्काळ देणार.
– घृष्णेश्वर मंदिर विकासासाठी प्रकल्प व्यवस्थापन समिती नेमणार.
– भडकल गेट ते घाटीपर्यंतच्या रस्त्यासाठी एक कोटी रुपये देणार.
– कोरोनाकाळात काम करणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे थकित वेतन देऊ.

इतर बातम्या- 

Aurangabad: लसीकरण वाढवण्यासाठी मनपाकडे व्हॅक्सिनेटर्सचा तुटवडा, सध्याची केंद्रसंख्या अपुरी

आंध्रप्रदेशातून आलेला 39 किलो गांजा जप्त, तेलगू भाषिक आरोपींची चौकशी करताना औरंगाबाद पोलिसांची अडचण