औरंगाबाद जि.प सभापतींनी मागितली 5% दलाली, खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे काय तक्रार केली?

| Updated on: Feb 22, 2022 | 10:56 AM

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत राजकीय वातावरण तापले असताना खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली आहे.

औरंगाबाद जि.प सभापतींनी मागितली 5% दलाली, खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे काय तक्रार केली?
Follow us on

औरंगाबादः औरंगाबाद जिल्हा परिषदेचे (Aurangabad ZP) बांधकाम सभापती किशोर बलांडे हे 5 टक्के दलाली मागत असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यामुळे औरंगाबादच्या प्रशासकीय आमि राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. अशा प्रकारे एखाद्या खासदारांनी थेट जिल्हा परिषद सभापतींवरच आरोप केल्याची ही पहिलीच घटना आहे. माझ्या मतदार संघासाठी विकास निधी देण्याकरिता बांधकाम सभापती बलांडे 5% मागत आहेत, असा उघड भ्रष्टाचार कधीच पाहिला नाही, असे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केलं आहे. तसेच या सगळ्या प्रकाराची तक्रार त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली असल्यामुळे औरंगाबादची यंत्रणेत खळबळ माजली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांचं ट्वीट

काय आहे नेमकी तक्रार?

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करत एक ट्वीट केले आहे. त्यात थेट बलांडे यांच्यावर आरोप करण्यात आले आहे. याविषयी सविस्तर बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, कन्नड आणि वैजपूर, गंगापूर तालुक्यातील काही गावांत अंतर्गत रस्ते बांधकामासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयात साडे आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी पाठवला होता. जिल्हा नियोजन समितीतून मला फक्त 50 लाख रुपये मिळाले. ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. या कामांना मंजुरीसाठी माझा कार्यकर्ता बलांडे यांना भेटला तर त्यांनी 5 टक्के कमिशन मागितले. माझ्यासारख्या खासदाराला अशी मागणी केली जात असेल तर जिल्हा परिषद आणि इतर सरकारी कार्यालयात किती भ्रष्टाचार आहे, याचा अंदाज येऊ शकतो. म्हणून ही परिस्थिती सुधारण्यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. ते योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा आहे, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

सर्व आरोप बिनबुडाचे- किशोर बलांडे

दरम्यान, माझ्यावर झालेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं स्पष्टीकरण जिल्हा परिषद बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी दिलं आहे. त्यांच्या कामाचा एकही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. जिल्हा नियोजन समितीकडून कामांचे नियोजन होते, त्यामुळे मी पैसे मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया किशोर बलांडे यांनी दिली आहे.

पुरावे असतील तर कारवाई करू- जिप. सीईओ

औरंगाबाद जिल्हा परिषदेत प्रशासकीय पातळीवर कोणताही भ्रष्टाचार होत नाही. तरीही काही तक्रार असल्यास, त्याची योग्य कागदपत्रे दिल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ निलेश गटणे यांनी दिली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत राजकीय वातावरण तापले असताना खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली आहे.

इतर बातम्या-

हे तर कुत्र्या-मांजराचं भांडण! पण कोण कुत्रा अन् कोण मांजर हे पहायला पाहिजे, शिवसेना-भाजप वादावर काय म्हणाले आठवले?

आज माझा भरून आला आहे ऊर, कारण पाठीशी उभं आहे वाळूज पंढरपूर, रामदास आठवलेंनी जिंकलं औरंगाबादकरांचं मन