नरेंद्र मोदी यांनी आधी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला हवा होता; प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्द्यावरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना काही सल्लेही दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी जनतेमध्येच जेवण करावं. दहा बारा लोकांमध्ये जेवू नये, असा सल्ला देतानाच मी ओबीसी आणि मराठा समाजात मध्यस्थी करायला तयार आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी आधी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला हवा होता; प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 24, 2024 | 6:21 PM

धाराशिव | 24 जानेवारी 2024 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यापूर्वी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, असं मोठं आणि खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आंबेडकर यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर धाराशीवमध्ये आहेत. मीडियाशी संवाद साधत होते.

भारत देशात धर्माचा प्रचार, प्रसार करायला पाहिजे. पण त्याअगोदर आपण कुठल्या पदावर आहोत हे पाहायला हवे. रामाची प्राणप्रतिष्ठा करायला विरोध नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन प्राणप्रतिष्ठा करायला हवी होती. पण आपले पंतप्रधान पद जाईल या भीतीपोटी त्यांनी पदावर राहूनच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

रोहित पवार यांना सल्ला

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही सल्ला दिला. आपण काही केलं नसेल तर घाबरू नका. आपली संपत्ती जाहीर करा, असा सल्लाही त्यांनी रोहित पवार यांना दिला.

मी मध्यस्थीला तयार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आरक्षणाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा, ओबीसी मराठा आणि ओबीसी समाज उभा ठाकला आहे. या दोन्ही समाजात मी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे पाटील हे आंदोलनात आहेत. त्यांनी आंदोलनात असताना काही गोष्टींचं पथ्य पाळलं पाहिजे. त्यांनी पाच दहा लोकांसोबत जेवू नये. आंदोलनात असताना त्यांनी आंदोलकांमध्ये बसून जेवलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचं असून त्यांनी सरकारला जेरीस आणलं आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत निजामी मराठे यांच्यापासून सावध राहायला हवं. नाही तर ते घात करतील, असंही ते म्हणाले.

आघाडीचं निमंत्रण नाही

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाच्या नेत्यांची स्वाक्षरी असलेले कुठलेही पत्र अथवा निमंत्रण प्राप्त झालेले नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीला “बिन बुलाए मेहमान” बनून आम्ही जाणार नाही. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत जो दावा केला आहे तो खोटा आहे. आम्हाला जोपर्यंत तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या असलेले अधिकृत निमंत्रण प्राप्त होत नाही तो पर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. आमची शिवसेनेसोबत युती आहे. पण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी करू नये, असं वंचितने म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us