Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचा विखे पाटलांवर जिव्हारी लागणारा घाव; थेटच म्हणाले, तुम्हीच…
मनोज जरांगे पाटलांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर मराठा आरक्षणासंदर्भात तीव्र हल्ला चढवला. विखे पाटलांनी मराठा समाजाचे मोठे नुकसान केले, एक वर्ष वाया घालवले आणि देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न पूर्ण केले, असा आरोप जरांगे यांनी केला. त्यांच्यामुळेच मराठा आरक्षण प्रक्रिया रखडली. उपोषणाच्या ११ व्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांनी विखेंना 'खरे बोला' असे आव्हान दिले.

राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठ्यांचं सर्वात मोठं वाटोळं केलं आहे. त्यांच्या एवढं कुणीच वाटोळं केलं नाही. त्यांनी गोड गोड बोलून आमचं वर्ष वाया घालवलं. मराठ्यांचं नुकसान केलं. विखेंनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न पूर्ण केलं, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर हल्ला चढवला. विखे पाटलांनी आता तरी खरं बोलावं, असं आव्हानही त्यांनी दिलं. जरांगे पाटील मीडियाशी संवाद साधत होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 11 वा दिवस आहे. जरांगे यांनी पाणी सोडलं आहे. उपचारही घेणं बंद केलं आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. मीडियाशी बोलताना जरांगे यांना धाप लागल्याचं दिसत होतं. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. विखेंनी खरं बोलावं. त्यांच्यामुळेच आमचं वाटोळं झालं आहे. समाजाचं नुकसान झालं आहे. सातारा संस्थानचं गॅझेटेरियर एक महिन्यात देतो असं विखे म्हणाले होते. एक वर्ष झालं. आताही बरीच आश्वासने दिली. कोणत्या हैद्राबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र दिलं? काहीच दिलं नाही. केवळ आश्वासन दिलं. विखेंनी वाटोळं केलं. मराठा संपायला आला. कामं झाले नाही, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
मला बोलायला लावू नका
मला बोलायला लावू नका. नाही तर मी खूप बोलणार आहे. मराठ्यांचं वाटोळं झालं त्याला विखे जबाबदार आहेत. फडणवीस यांचं गुणगाण गायचं आणि शरद पवार यांनी काही दिलं नाही हे वारंवार सांगायचंच काम विखेंनी केलं. वर्षभर त्यांनी हेच केलं. पवारांनी दिलं नाही. पण तुम्ही देऊन वाटोळं केलं, असा हल्लाही जरांगे यांनी चढवला.
अंतरवलीत येऊ नका
तुम्ही काय केलं सांगा? बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठ्यांचं नुकसान केलं. तुम्ही काही केलं नाही. तुम्ही मराठ्यांवर कलंक आहात. तुम्ही हक्क द्यायला हवे होते. तुम्हाला लोक डोक्यावर घेऊन नाचले असते. तुम्ही काहीच केले नाही. नाकर्तेपणाचं काम केलं. मराठ्यांना काहीच मिळालं नाही, याचं खापर तुमच्यावरच फुटणार आहे. तुम्हीच वाटोळं केलं. तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही अंतरवलीत येऊ नको. तुला कोण या म्हणतंय?असा हल्लारही त्यांनी विखेंवर चढवला.