औरंगाबादेत वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेचा मोर्चा; संजय राऊत करणार नेतृत्व

| Updated on: Nov 13, 2021 | 8:00 AM

देशात उडालेला महागाईचा भडका, गगणाला भिडलेल्या पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती यासह अन्य दरवाढीच्या विरोधात शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वतीने महागाईविरोधात भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे.

औरंगाबादेत वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेचा मोर्चा; संजय राऊत करणार नेतृत्व
संजय राऊत
Follow us on

औरंगाबाद – देशात उडालेला महागाईचा भडका, गगणाला भिडलेल्या पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती यासह अन्य दरवाढीच्या विरोधात शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वतीने महागाईविरोधात भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात क्रांतीचौक येथून होणार असून, शहरातील गुलमंडी परिसरात मोर्चाची सांगता होणार आहे. मोर्चानंतर संजय राऊत हे सभा देखील घेणार आहेत. या मोर्चाला शिवसेना मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांची उपस्थिती असणार आहे.

सर्वच वस्तू महाग झाल्या 

त्यापूर्वी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना दानवे म्हणाले की,  केवळ इंधन दरवाढीवर अवलंबून वस्तूंच्याच दरात वाढ झाली नाही तर मोबाइल फोनचे रिचार्ज, एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेतही अधिक पैशांची कपात होत आहे. पेट्रोल महाग, डिझेल महाग, गॅस महाग, अत्यावश्यक वस्तुंचे दर देखील गगणाला भिडले अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांनी जगायचे कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याचाच निषेध करण्यासाठी 13 नोव्हेंबरला शिवसेना संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

मोर्चावरून मनसेचा शिवसेनेवर निशाणा

मनसेकडून मात्र या मोर्चावर टीका करण्यात आली आहे. आज काढण्यात येणाऱ्या मोर्चावरून मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे, महागाईच्या विरोधात मोर्चाचे सोंग करण्यापेक्षा राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी कधी देणार? पाणी पुरवठा योजना कधी पूर्ण होणार, औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर कधी करणार? हे सांगावे असे दाशरथे यांनी म्हटले आहे. शिवसेनेकडे या प्रश्नांची उत्तरे असतील तरच त्यांना मोर्चा काढण्याचा अधिकार असल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

 

संबंधित बातम्या 

‘रंग दे बसंती’ ची कथा चोरल्याच्या आरोपातून दिग्दर्शक राकेश मेहरा दोषमुक्त, औरंगाबाद कोर्टाचा निकाल

VIDEO: दगडफेक, लाठीमार आणि कडकडीत बंद, राज्यातील हिंसक घटनांचे 5 महत्त्वाचे व्हिडीओ!

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट? मुंबई सेंट्रल आगारातून पहिली एसटी धावली; राज्यात 826 एसटी रस्त्यावर