Aurangabad Top 5: शहर आणि परिसरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घ्या मोजक्या शब्दात

| Updated on: Sep 13, 2021 | 6:21 AM

14 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, धुळे, नंदुरबार, जळगाव, भंडारा गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Aurangabad Top 5: शहर आणि परिसरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घ्या मोजक्या शब्दात
Follow us on

औरंगाबाद: मराठवाड्याची राजधानी, देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ, ऐतिहासिक नगरी, उद्योग नगरी म्हणून ख्यात असलेलं औरंगाबाद शहर. हेच शहर आता स्मार्ट सिटी म्हणूनही नावारुपाला येत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक घडामोडींवर माध्यमांचीही नजर असते. जाणून घेऊयात औरंगाबाद शहर आणि परिसरातील पाच महत्त्वाच्या बातम्या अर्थात Aurangabad Top 5 काय आहेत-

  1. वरुणराजाच्या साक्षीने घरोघरी गौरींचे थाटात आगमन

    औरंगाबाद शहरात रविवारी घरोघरी गौरी अर्थात महालक्ष्मींच्या आगमनाची लगबग सुरु होती. दुपारी 11.50 वाजेनंतर महालक्ष्मीच्या आवाहनाचा मुहूर्त होता. त्यानुसार अनेक घरांमध्ये सर्व कुटुंबीयांनी एकत्रित येत हार, फुल, गजरे आणि दीपमाळांच्या लखलखटातील मखरात ज्येष्ठा-कनिष्ठा बसवल्या. राज्यातील इतर ठिकाणच्या परंपरांनुसार मराठवाड्यातही महालक्ष्मी सणाचं मोठं महत्त्व आहे. रविवारी महालक्ष्मींच्या आगमनाला वरुणराजानंही हजेरी लावली. त्यामुळे सणासाठी काही खरेदी करायची राहून गेलेल्या नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. शहरात काल MGM JNEC केंद्रात 13.2 मिमी तर एमजीएमच्या गांधेली केंद्रात 5.1 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, शहरातील सर्व प्रमुख गणेशमंडळांतील गणपती प्रत्यक्ष पाहण्यासाठी शहर पोलिस विभागाकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. केवळ ऑनलाइन किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दर्शन घेण्याची सूचना पोलिस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.

  2. औरंगाबाद, जालन्याला यलो अलर्ट

    गणपतीच्या आगमनापासून म्हणजेच शुक्रवारपासून मराठवाडा आणि परिसरात पुन्हा एकदा पावसाचं वातावरण आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण परिसरात काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागररातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मान्सूनचा आस, मध्य भारतावर असलेले परस्पर विरोधी वाऱ्यांचे प्रवाह यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात औरंगाबादेत जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागानं वर्तवली आहे. विशेष म्हणजे 14 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, धुळे, नंदुरबार, जळगाव, भंडारा गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  3. शहरात चर्चा कपडे बदलून केलेले चोरीची

    शहरातील देवळाई परिसरातील शालीकराम मैनाजी चौधरी यांच्या घरी झालेल्या चोरीची सध्या शहरात चर्चा आहे. 11 सप्टेंबर रोजी शनिवरी शालीकराम हे दुपारी दोन वाजता पत्नीला घेऊन रुग्णालयात गेले व संध्याकाळी पाच वाजता घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांना कळले. चोरट्यांनी सर्व सामान अस्तव्यस्त करत कपाटातील सोन्याच्या अंगठ्या, लॅपटॉप, मिक्सर, इस्त्री, हेअर ड्रायर तसेच 23 हजार रुपयांची रोकड असा एकूण 65 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्यांनुसार, चोराने पहिल्यांदा पांढरे टीशर्ट घालून काही वस्तू पळवल्या. थोड्या वेळाने तोच निळ्या रंगाचे टी शर्ट घालून आला व आणखी काही वस्तू घेऊन दुचाकीवरून पसार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  4. ‘मधुर मिलन’ मिठाईच्या मालकावर गुन्हा दाखल

    शहरातील प्रसिद्ध मधुर मिलन मिठाईच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन रस्त्यावरील सिद्धार्थ ऑर्केडमध्ये डुंगरसिंग हिरालाल राजपुरोहित व त्याचा भाऊ राजूसिंग यांचे मधुर मिलन दुकान आहे. मागील काही दिवसांपासून यांनी महावितरणचे 1लाख 2 हजार 860 वीज बिल थकवले आहे. वारंवार सूचना केल्यानंतर त्यांनी 17ऑगस्टो रोजी 50 हजारांचा धानदेश दिला. मात्र तो वठलाच नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी डुंगरसिंगशी संपर्क साधून वीज बिल देण्यास सांगितले. शनिवारी दोन्ही भावांनी वठलेला चेक परत मागितला. मात्र तो मंगळवारपर्यंत मिळेल, असे सांगितल्यावर अधिकाऱ्यांशी वाद सुरु झाले. यात राजूसिंग सातदिवेने अधिकाऱ्याचा गळा पकडून, जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर दोन्ही भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

  5. राष्ट्रीयीकृत बँकांची महत्त्वाची बैठक

    केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबादमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 12 राष्ट्रीयीकृत बँकांच्या अध्यक्षांची बैठक पार पडणार आहे. 16 सप्टेंबर रोजी या बैठकीचे आयोजन हॉटेल ताज येथे करण्यात आले आहे. दै. दिव्य मराठीने दिलेल्या सविस्तर वृत्तानुसार, या बैठकीत प्रामुख्याने मुद्रा योजनेतील कर्ज वाटप, डिजिटल व्यवहार, ग्रामीण भागातील बँकिंगची अवस्था, कोरोन काळातील पॅकेजची अंमलबजावणी, विलिनीकरणानंतरची स्थिती आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. एरवी दिल्ली, मुंबईत होणारी बैठक यंदा प्रथमच मराठवाड्याच्या राजधानीत होत आहे.

    इतर बातम्या- 

    Aurangabad Weather: मराठवाड्यात पुन्हा पावसाला सुरुवात, येत्या 3-4 दिवसात जोर वाढण्याची शक्यता, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोलीसह नांदेड अलर्टवर

    Aurangabad Gold: ऐन सणाला का रुसली चांदी अन् सोनंही बसलं? सराफा बाजाराला हवंय चैतन्य, पहा काय आहे स्थिती?