Sanjay Raut : राम मंदिरातून पैशांची चोरी… उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार; राऊत म्हणाले, देशात रामाचं राज्य नसून…
अयोध्या राम मंदिरातील कथित दान गैरव्यवहार आणि चोरीप्रकरणी देशभरात खळबळ उडाली आहे. खासदार बृजभूषण सिंहांनी जीवाला धोका असल्याचे सांगत यावर भाष्य केले. संजय राऊत यांनी यावर चिंता व्यक्त करत, उद्धव ठाकरेही अस्वस्थ असल्याचे म्हटले. राम मंदिरातील पैशांची चोरी कोण करतंय, सीसीटीव्ही फुटेज का गायब झाले, यावर राऊतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून लवकरच अयोध्या दौरा करण्याची घोषणा केली.

अयोध्या येथील राम मंदिरातील दानाचा कथित गैरव्यवहार आणि चोरी प्रकरणावरून देशभरात खळबळ उडाली आहे. राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराबाबत मला बरंच काही ठाऊक आहे, पण मी आत्ता बोलणार नाही, माझ्या जीवाला धोका आहे, असं वक्तव्य खासदार बृजभूषण सिंह यांनीही केलं. यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, नेते संजय राऊत यांनीही या विषयावर भाष्य केलं. माध्यमांशी संवाद साधत असताना ते काँग्रेस मजबूत करणं, राष्ट्रवादीचे विलीनकरण यासह राम मंदिराच्या मुद्यावरूनही बोलले. उद्धव ठाकरे आणि आपण लौकरच अयोध्येला जाणार असल्याचंही राऊत म्हणाले.
राम मंदिरांच्या देणग्यांबाबतची बातम्यांनी आम्ही अस्वस्थ
राम मंदिरांच्या देणग्यांबाबतची बातमी वाचून उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत, हे कळल्यापासून आम्ही सर्व अस्वस्थ आहोत. काल त्यांची आणि आमची चर्चा झाली. बहुतेक आपल्याला रामाचं परत बोलावणं आलं आहे. आम्ही यावं आणि या विषयाला तोंड फोडूावं तिथे बसून. आम्ही स्वत: किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरूवातील राम मंदिर उभ राहत असताना, आम्ही राम मंदिराला मोठी देणगी दिली. एक कोटी रुपये दिले त्या काळात, ते आम्ही आहोत. त्यामुळे आम्हाला देणग्याचे महत्त्व माहित आहे. आमच्यानंतर अनेकांनी देणग्या दिल्या. काहींनी गुप्त दान दिलं असेल. आम्ही उघड दान दिलं. दान पेटीचे चोर कोण? हे पैसे कोण पळवतंय वारंवार? असा सवाल संजय राऊत यंनी उपस्थित केला.
सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले? याची चौकशी का होत नाही ? नरेंद्र मोदींनी या मंदिराच्या प्रतिष्ठापनेत राजकारण करून मते मागितली. ते गप्प का बसले ? असा खड़ा सवालही राऊत यांनी विचारला.
आम्ही लवकरच अयोध्याला जाऊ
त्या भागातले भाजपचे एक नेते, बृजभूषण सिंह खासदार होते, नेते आहेत त्या भागातले, रामजन्मभूमीच्या आंदोलनात ते होते. ते म्हणतात मला सर्व माहिती आहे. पण ही इतकी मोठी माणसं आहेत, मी काही बोललो तर माझ्या जीवाला धोका आहे. म्हणजे असं काय आहे. या राम मंदिराच्या लुटण्याच्या प्रक्रियेत कोण आहे? असं राऊत यांनी विचारलं. बाहुबली असलेल्या बृजभूषण शरण सिंह यांनाही त्यांची भीती वाटते म्हणजे नक्की काय आहे? असं विचारत आम्ही लवकरच अयोध्याला जाऊ, ती योजना लवकरत जाहीर करू, असे संजय राऊत म्हणाले.
या देशावर रामाचं राज्य नसून चोराचं राज्य
हे लोकं राम मंदिरात चोऱ्या करू शकतात, तर मतं चोरणं, निवडणूक चोरणं आणि विजय चोरणं हे काहीच नाही. राम मंदिरातील पाच कोटी चोरायला काही वाटत नसेल, तर या लोकांना काहीच वाटणार नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली. याप्रकरणी तक्रार कशासाठी नोंदवली पाहिजे? अनेक गोष्टी उघड झाल्या. आम्ही अयोध्येत जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न करू. पैशाची अफरातफर झाल्याचं सिद्ध झालं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. नंतर जशी मतं चोरतात, तसं हे फुटेजही चोरलं आहे. या देशावर रामाचं राज्य नसून चोराचं राज्य आहे, अशी टीकास्त्र राऊत यांनी सोडलं.