बच्चू कडू यांचा दुहेरी ‘प्रहार’, सरकारला घरचा आहेर देत संजय राऊत यांनाही डिवचलं

| Updated on: Mar 21, 2023 | 4:03 PM

नेहमीच परखड वक्तव्यांनी चर्चेत असलेल्या बच्चू कडू यांनी आज सत्ताधारी आणि विरोधक या दोघांवरही सणकून टीका केली आहे. देशातील आर्थिक विषमेतवरही त्यांनी मोठं भाष्य केलंय.

बच्चू कडू यांचा दुहेरी प्रहार, सरकारला घरचा आहेर देत संजय राऊत यांनाही डिवचलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गिरीश गायकवाड,  मुंबई | प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आज सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांवर तुफ्फान टीका केली. तसं तर बच्चू कडू शिंदे-भाजप (Shinde-BJP) सरकारचे समर्थक आहेत. मात्र एखाद्या मुद्द्यावर वेळप्रसंगी ते सरकारलाही घरचा आहेर द्यायला कमी करत नाहीत. आपल्या नावातच कडू आहे, असे ते तितक्याच ठामपणे सांगत असतात. राज्यात गुढीपाडवा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिंदे सरकारने घोषित केलेल्या आनंदाचा शिधा योजनेवरून बच्चू कडू यांनी सरकारचे कान टोचले आहेत. तर सरकारवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांनाही चांगलंच सुनावलंय.

काय म्हणाले बच्चू कडू?

राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आनंदाचा शिधा योजनेला प्रचंड विलंब झाला आहे. त्यामुळे गुढीपाडव्यापर्यंत आनंदाचा शिधा रेशन दुकानांपर्यंत पोहोचणार नाही, अशी स्थिती आहे. यावरून सरकारवर विरोधकांकडून टीका केली जातेय. यावरून बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राज्य कुणाचे जरी असलं तरी आयुष्य हे कडूच आहे. या देशात दोन वर्ग आहेत. उपाशी झोपणारा आणि तुपाशी खाणारा असे दोन वर्ग आहेत. सगळ्या पक्षानं तुपाशी खाणाऱ्या लोकांचीच व्यवस्था केली आहे. त्यामुळे विरोधकांनाही टीका करण्याचा नैतिक अधिकार नाहीये, असा दुहेरी प्रहार बच्चू कडू यांनी केलाय..

विरोधकांवर काय टीका?

विरोधकांवर बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘तुम्ही सत्तेत होते, तेव्हा सामान्य माणसासोबत किती होते, हे आठवा. सत्तेच्या बाहेर आले की तुम्हाला उपाशी लोकांची आठवण होते. सत्तेत आले की तुपशी माणसासोबत तुमच्या भेटीगाठी होतात.

देशातल्या जाती नष्ट होतायत…

देशातल्या आर्थिक विषमतेवर बच्चू कडू यांनी गंभीर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘ देशातल्या जाती नष्ट होतायत, श्रीमंत -गरीब, कष्ट करणारे आणि हरामखोरीनं जगणारे असे दोन वर्ग तयार होत आहेत. म्हणून एकिकडे रस्ते, नाला नाही, पूल नाही, शाळा नाही, आरोग्य यंत्रणा नाही, असली तरी अत्यंत बिकट अवस्था आहे. असा वर्गा आहे. कष्ट करूनही संध्याकाळचं जेवण मिळेल की नाही सांगता येत नाही. तर दुसरीकडे पोट वाढलं म्हणून रोज फिरायला जावं लागतं, त्यासाठी सगळे राजकीय नेते त्याच्यासोबत उभे राहतात….

संजय राऊत यांच्या मेदूवर परिणाम

संजय राऊत यांनी आनंदाचा शिधा न मिळाल्याने सरकारवर तीव्र टीका केली. यावरून बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ संजय राऊत यांच्या स्वप्नात रोज खोके येतात. त्यांच्या मेंदूत काही फरक झालाय, तो दुरुस्त करणं गरजेचं आहे…