हाती शिवबंधन बांधताच बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मी अन्नाला कधीच…

माजी मंत्री बच्चू कडू यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे. हाती शिवबंधन बांधताच त्यांनी पुढचा राजकीय प्रवास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात असेल, असे जाहीर केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयीही त्यांनी भाष्य केलं.

हाती शिवबंधन बांधताच बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मी अन्नाला कधीच...
bacchu kadu and eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 30, 2026 | 3:32 PM

Bacchu Kadu Joins Shivsena : विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने सुरुवातीला आम्ही आमचा स्वतंत्रपणे उमेदवार देऊ, अशी भूमिका घेतली होती. आता मात्र आम्ही दानवे यांना पाठिंबा देऊ असे सांगितले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना माजी मंत्री बच्चू कडू यांनीही शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. शिवसेनेत प्रवेश करताच त्यांनी आता पुढच्या वाटचालीवर भाष्य केले आहे. शिवेसनेत दाखल झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आता पुढचा प्रवास शिंदे यांच्या नेतृत्त्वात

यापुढे आता माझ्या राजकारणाचा प्रवास हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राहणार आहे. माझी सुरुवातही शिवसेनेत झाली. आताचं पुढचं 15 ते 20 वर्षांचं राजकारणही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वात राहील, असे बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले.

खाल्लेल्या अन्नाला बेईमान होणार नाही

तसेच, माध्यम प्रतिनिधींशी बोलताना, मी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे अनेकांना वाटत असेल की आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन होणार नाही. वेळ पडली तर आम्ही आंदोलन करणारच आहोत. आता यापुढे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांसाठी ताकदीची लढाई शिवसेना लढणार आहे, असे यावेळी बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. वेळ पडली तर शिवसेना रस्त्यावरही येईल. शेतकरी आमच्यासाठी माय-बाप आहे. शेतकऱ्यांमुळेच आमच्या पोटात अन्न भेटते. आम्ही शेतकऱ्यांच्या खाल्लेल्या अन्नाला आम्ही बेईमान होणार नाहीत, असेही यावेळी बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू यांना मंत्रिपदाचीही ऑफर

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत शिंदे यांनी बच्चू कडू यांना त्यांचा प्रहार जनशक्ती हा पक्ष शिवसेनेत विलीन करावा, आम्ही आम्ही तुम्हाला विधानपरिषदेत आमदारकी तसेच मंत्रिपद देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर बच्चू कडू लवकरच शिवसेनेत दाखल होतील, असे म्हटले जात होते. त्यामुळे आता बच्चू कडू यांना मंत्रिपद कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us