‘नवनीत राणा यांच्या घरात कलह’, बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

"रवी राणा यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांना पराभव पचवता आला नाही. बायको भाजपात आणि हे स्वाभिमानी पक्षामध्ये आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम झाला. उठसूठ मला बोललं की त्याचा मोठा नेता खुश होतो, त्यासाठी हे सगळं करत रहातो", अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

नवनीत राणा यांच्या घरात कलह, बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
| Updated on: Jun 17, 2024 | 8:53 PM

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय. यावरुन बच्चू कडू यांनी नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बच्चू कडू यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याबाबत खळबळजनक दावा केला. “नवनीत राणा सतत टीव्हीवर दिसायच्या. त्यामुळे रवी राणा जरा दबून गेला होता. त्यांच्या घरात अंतर्गत कलह आहे. त्यामुळे स्वाभिमान पार्टीनेच भाजपच्या नवनीत राणाला पाडलं”, असा खळबळजनक दावा बच्चू कडू यांनी केला. “दोन वर्षांपासून सातत्याने रवी राणा आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपाला आता कोर्टातून उत्तर देऊ”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

“भाजपचं राज्यात सरकार नाही आलं तर स्वाभिमान पार्टी पुन्हा आघाडीबरोबर जाऊन बसेल. गेल्यावेळी राणा राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर निवडून आल्या आणि जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला”, असं बच्चू कडू म्हणाले. “रवी राणा यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांना पराभव पचवता आला नाही. बायको भाजपात आणि हे स्वाभिमानी पक्षामध्ये आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम झाला. उठसूठ मला बोललं की त्याचा मोठा नेता खुश होतो, त्यासाठी हे सगळं करत रहातो”, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. “जे नालायक आहेत त्यांच्यासाठी आम्ही कपटीच आहोत. अफजल खानचा कोथडा छत्रपतींनी फाडला होता ना? तसा आम्ही कपट्याला फाडतो”, असं बच्चू कडू म्हणाले.

राणा आणि बच्चू कडू यांच्यात सातत्याने वाद

राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात सातत्याने वाद सुरु असतात. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत असतात. खरंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रवी राणा आणि बच्चू कडू हे महायुतीचे घटक झाले होते. पण रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर 50 खोके घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे बच्चू कडू यांना राणांचा प्रचंड संताप आला. तेव्हापासून अमरावतीतलं राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका-टीप्पणी करण्याची एकही संधी हे नेते सोडत नाहीत. विशेष म्हणजे रवी राणा यांनी लोकसभा निवडणुकीवेळी देखील बच्चू कडू यांना डिवचलं होतं. त्यामुळे बच्चू कडू संतापले होते.

रवी राणा यांनी आज सकाळीच बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केला होता. नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी बच्चू कडू यांना ‘मातोश्री’ येथून रसद पुरवण्यात आल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहार पक्षाचा उमेदवार उभा केला होता. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मदतीने बच्चू कडू यांनी ही राजकीय खेळी खेळल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर देत राणा दाम्पत्याच्या कुटुंबात गृहकलह सुरु असल्याचा खळबळजनक दावा केला.