मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी फसवलं? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्यानंतर आता बच्चू कडू यांनी देखील उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार करत मोठा दावा केला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. मात्र बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं प्रहारचे पदाधिकारी नाराज आहेत, मराठवाड्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ‘मातोश्री’वर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता, घरी बोलवून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली, जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा मला आनंद आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता बच्चू कडू यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता, मात्र राज्यमंत्रिपद दिलं. माझ्याऐवजी गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच गोवाहाटीला जाताना देखील उद्धव ठाकरे यांना मी विचारलं होतं असंही ते म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंनीच उद्धव ठाकरेंसोबत माझी भेट घालून दिली होती असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
आमच्या मतांमुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन आम्ही त्यांना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंनी आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता, संख्याबळासाठी उद्धव ठाकरेंनी आम्हाला गळ घातली होती, ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून मला मंत्री केलं. उद्धव ठाकरेंनी दिव्यांग मंत्रालय दिलं नाही, त्यांनी माझ्याऐवजी गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. शिवसेना फुटल्याचं खापर माझ्यावर फोडू नका, असंही यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे माझ्याबद्दल जे काही बोलले ते मनापासून बोलले असं वाटत नाही.
आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं, मग आम्ही चूक केली असं म्हणणार का? असा सवालही यावेळी बच्चू कडू यांनी ठाकरेंना केला आहे.