
गेल्या काही काळापासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड नेहमीच चर्चेत आहे. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात दादागिरी पहायला मिळत आहे. तसेच गेल्या काही काळात अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्या असून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण संपूर्ण राज्यासह देशातही गाजले होते. या प्रकरणी दोषींना अटक करण्यात आलेली आहे, मात्र कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. अशातच या प्रकरणातील एक आरोपी जयराम चाटे आज (13 मार्च) भावाच्या बाराव्याच्या विधीकरिता तुरूंगातून बाहेर आला होता. अशातच जयराम चाटे बाहेर येण्याची माहिती मिळताच बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात काल दुपारी पाच जणांनी संग्राम चाटे नामक तरुणाला अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला करत हत्येचा प्रयत्न केला. मारहाण करताना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळेचे नाव घेत धमकावले. ‘तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो ‘असे म्हणत हल्ला केला.
या हल्ल्यात तरूण संग्राम चाटे गंभीररित्या जखमी झाला असून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी केज पोलीसात पाच आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आज एक दिवसासाठी जेलच्या बाहेर आलेला असून तांबवा येथे तो भावाच्या बाराव्याच्या विधीसाठी पोहोचला आहे. तो बाहेर येण्यापूर्वीच त्याच्या टोळीतील सदस्यांकडून गाव परिसरात तरुणावर हल्ला करत दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, तब्बल 14 महिन्यानंतर जयराम चाटे हा काही तासांसाठी तुरूंगाच्या बाहेर आलो होता. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात तो विधीसाठी हजर होता. यानंतर त्याला पुन्हा तुरूंगात नेण्यात आले. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मिक कराडसह अनेकांना अटक करण्यात आलेली आहे.