तो तीनदा गावात…फरार कृष्णा आंधळेविषयी मोठा दावा, धनंजय देशमुखांचा सनसनीखेज खुलासा, बीड पोलीस करताय काय?

Dhananjay Deshmukh on Krushna Andhale: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बीड पोलीस याप्रकरणात जाणूनबुजून कानाडोळा करतायेत की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. धनंजय देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे.

तो तीनदा गावात...फरार कृष्णा आंधळेविषयी मोठा दावा, धनंजय देशमुखांचा सनसनीखेज खुलासा, बीड पोलीस करताय काय?
धनंजय देशमुख, कृष्णा आंधळे, संतोष देशमुख
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 21, 2026 | 1:57 PM

Dhananjay Deshmukh on Krushna Andhale: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्य हादरले होते. या क्रूर हत्येनंतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत राज्यात अनेक मोर्चे निघाले. दबावानंतर पोलीस प्रशासन हालले. तपास यंत्रणा जागी झाल्या. प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली. वाल्मिक कराड हा या कटाचा मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला. या खून प्रकरणात अद्याप कृष्णा आंधळे हा फरार आहे. तो जिवंत आहे की त्याचा गेम झाला याविषयी शंका व्यक्त होत होत्या. पण त्याच्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे.

सर्व साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर आणणार

मागच्या काही दिवसात जो लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबला दिला होता.त्यामध्ये पूर्ण रिकव्हरी आलेली आहे. पुढील सुनावणी त सर्व साक्षीदारांची यादी देण्यात येणार आहे आता जो डिले करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसापासून त्यांनी केलेला होता. एक तर त्यांना चार्ज प्रेम होऊ द्यायचं नव्हतं. आता या प्रकरणी दोषारोप झाला आहे.लवकरच साक्षी पुराव्याची यादी दिली जाणार आहे.लवकरात लवकर ही केस मार्गी लागावी अशी माझी मागणी आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले.

येत्या सहा तारखेला होणाऱ्या सुनावणीत आम्ही आरोपींची संपत्ती जप्त करण्याविषयी पाठपुरावा करण्यास कुठे कमी पडणार नाही. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि सहाय्यक सरकारी वकील यांनी याचा पाठपुरावा केला आहे. जे सीज केलेले अकाउंट आहेत. ते लवकरच जप्त करण्यात यावेत यावर आम्ही एक पाऊल उचलणार आहोत हे तुम्हाला लवकरच बघायला मिळेल, असे धनंजय देशमुखांनी स्पष्ट केले.

फरार कृष्णा आंधळे तीन वेळा गावात

फरार कृष्णा आंधळे हा तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेला. चालू सहा महिन्यात ही माहिती आम्हाला मिळाली आहे. ती आम्ही सीआयडी कार्यालयाला कळवली आहे. कृष्णा तीनवेळ गावात येऊन गेल्याची माहिती खरी आहे. त्यांनी देखील हे मान्य केलं आहे की आरोपी गावात येऊन गेला. पोलीस याप्रकरणी तपास करत आहे. पण आरोपी मोबाईल वापरत नाही. त्यामुळे तपास यंत्रणांना त्याला शोधण्यात अडचण येत आहे.

यावर काय करायचं आणि कशा पद्धतीत त्या आरोपीला जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करू. कारण या आरोपापासून आमच्या सर्व कुटुंबाला जीवितास धोका आहे. हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सर्व लोक आहेत. आम्ही ही मागणी केली आहे लवकरात लवकर कृष्णा आंधळेच्या मुसक्या आवळून पोलीस प्रशासनाने त्याची धिंड काढावी. आणि त्याला जेरबंद करावे अशी आमची मागणी आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले.