
अशोक/काळकुटे: राज्यात धुळवडीचे विविध रंग दिसून आले. कालपासून बच्चे कंपनी आणि अबालवृद्धापर्यंत अनेक जण विविध रंगात न्हाऊन निघाले. होळी, रंगपंचमीला अनेक गावात अनोख्या प्रथा आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावाने तर हटके परंपरा जोपासली आहे. या गावातील जावायाची थेट गाढवावरून मिरवणूक (Beed Holi Donkey Ride) काढण्यात येते. अर्थात यामागे कोणताही वाईट हेतू नसतो. तर चेष्टा मस्करीची ही परंपरा द्वेष पसरवणाऱ्यांच्या, किरकोळ गोष्टीवरून थेट जीवघेणा हल्ला करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन मानले जाते. काय आहे ही परंपरा? यावेळी मेव्हण्यांच्या कचाट्यात कोण जावाई अडकला? कुणी सुरू केली होती ही परंपरा?
अनंतराव देशमुखांनी सुरू केली परंपरा
बीडच्या केज तालुक्यातील विडा येथे गेल्या 90 वर्षांपासून कुठलाही एक जावई शोधुन गावात आणला जातो आणि त्या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. अनंतराव देशमुख यांनी 90 वर्षांपुर्वी स्वत: च्या जावयाची चेष्टामस्करीत गाढवावरून मिरवणूक काढली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या परंपरेला कोणतंही गालबोट लागलेलं नाही. कोणत्याही जावायाने यासाठी आढेवेढे घेतले नाही. उलट ही परंपरा गावाची शान मानली जाते आणि जावई सुद्धा हसत हसत ही थट्टा मस्करी सहन करतात. गाढवावरून मिरवणूक काढल्याने त्यांचा मान मरतब कमी होत नाही. मिरवणूक झाल्यानंतर जावायाचा मोठा सत्कार करण्यात येतो. त्यांनी ही परंपरा जोपासली म्हणून त्यांचा सार्वजनिक सत्कार करण्यात येतो. या परंपरेतून कोणताही विखार होत नाही.
यंदा सोन्याची अंगठी नाही
दरवर्षी आठ दिवस अगोदर पासूनच जावयाच्या शोधासाठी गावातील तरुण फिरत असतात. यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची मिरवणूक काढुन कपडे आणि सोन्याची अंगठी दिली जाते. मात्र यावर्षी सोन्याचे भाव वाढल्याने केवळ कपड्याचा आहेर जावयाला दिला गेला. दरवर्षी जावायाला सोन्याची अंगठी भेट देण्यात येते. पण सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने गावकऱ्यांनी यावेळी या प्रथेत मोठा बदल केला. त्यांनी सोन्याची अंगठी यंदा दिली नाही. केवळ कपड्यांचा आहेर जावयाला केला.
शिवाजी गालफाडे यांचा गावकऱ्यांकडून सत्कार
अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यंदा या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावर्षीचा मान शिवाजी गालफाडे या जावयाला मिळाला. गालफाडे हे मूळचे केज तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी आहेत. पण लग्नानंतर ते सासरवाडी विडा येथेच स्थायिक झाले. ते विडा गावातील बाबुराव दुनघव यांचे जावाई आहेत. गावात त्यांनी घर बांधले आहे. रोजंदारी करून ते चरितार्थ चालवतात. धुळवडीच्या दिवशीच तरुणांचा मोर्चा त्यांच्या घराकडे वळला आणि त्यांनी गदर्भराजवरून त्यांची मिरवणूक काढली. आपला या मिरवणुकीसाठी नंबर लागेल असे त्यांनीही वाटले नव्हते. रंगाची उधळण करत, गळ्यात जुन्या चप्पल-बुटांचा हार घालत गाढवावरून ही मिरवणूक काढली जाते.