
Walmik Karad Beed: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी 29 नोव्हेंबर रोजी अपहर करून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. याविषयीचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील कृष्णा आंधळे हा आरोपी वगळता इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज मस्साजोग येथे संतोष देशमुख यांचे पहिले पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्ताने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित आहेत.
वाल्मिकला फाशी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही
जोपर्यंत वाल्मीक कराडला फाशी होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे मोठे विधान आमदार संदीप क्षीरसागर यांनी मस्साजोग येथे केले. वाल्मिक कराडचा सीडीआर रिपोर्ट काढावा अशी मागणी आपण सुरुवातीपासून करत आहोत. सीडीआर काढल्यास कराड याला कोणी कोणी मदत केली याची माहिती समोर येईल असे संदीप क्षीरसागर म्हणाले. सगळ्यांना वाईट वाटतं, सगळ्या देशमुख कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू आहेत असे ते म्हणाले. याप्रकरणात सुरुवातीपासूनच क्षीरसागर हे देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभे ठाकल्याचे दिसते.
कृष्णा आंधळे जिवंत आहे का?
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अत्यंत निर्घृण खून करण्यात आला. तेव्हापासून सर्व आरोपी फरार होते. वाल्मिक कराड पुण्यात शरण येताच इतर आरोपींना सुद्धा पुण्यातूनच अटक करण्यात आली होती. पण कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो कधी नाशिकमध्ये दिसला तर कधी पुण्यात दिसला अशा अफवा उठत राहिल्या. पण त्याला अद्यापही पोलीस अटक करू शकलेले नाही. त्याने पोलीस यंत्रणेला खुले आव्हानच दिले आहे. दरम्यान फरार आरोपी कृष्णा आंधळे हा जिवंत आहे की नाही याबाबत आमदार क्षीरसागर यांनी शंका व्यक्त केली.
12 डिसेंबरला दोषारोपपत्र दाखल
12 तारखेला या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल होणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाल्याने संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याप्रकरणावर भाष्य केले.