गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येला अंघोळीसाठी म्हणून भावंडं गेली; आणि बघता बघता..

गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येला तीन भावंडं अंघोळीसाठी म्हणून शेततळ्यात उतरली. पण त्यावेळी त्यांना अंदाजच आला नाही. त्यामुळे तिघं भावंडं पाण्यात बुडाली.

गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येला अंघोळीसाठी म्हणून भावंडं गेली; आणि बघता बघता..
| Edited By: | Updated on: Mar 21, 2023 | 8:04 PM

बीड : गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच बीड जिल्ह्यातील केजमध्ये एक दुःखद घटना घडली आहे. चौधरी कुटुंबीयाताली तीन चुलत भावंडं एका पाण्याच्या खड्यात अंघोळीसाठी उतरली होती. मात्र ही तीनही लहान असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे अंघोळसाठी मुलं उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने अल्पवयीन तीनही भावंडं त्या पाण्याच्या खड्यात बुडाली. केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) येथे दुर्दैवी घटना घडली असून गावातील तीन अल्पवयीन चुलत भाऊ एकाच वेली शेतातील पाण्याच्या खड्ड्यात बुडल्याने शोककळा पसरली आहे.

केज तालुक्यातील आणि केजपासून 15 किलोमीटरवर असलेल्या पैठण (सावळेश्वर) येथे स्वराज जयराम चौधरी (वय 7 ), पार्थ श्रीराम चौधरी (वय 8), श्लोक गणेश चौधरी ही तीन चुलत भाऊ गणेश चौधरी वय (वय 7) यांच्या शेतातील बोअर शेजारी असलेल्या पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्ड्यात आंघोळीसाठी गेली होती.

त्यावेळी त्या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे या तीनही भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे सावळेश्वर परिसरावर शोककळा पसरली आहे. गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तीनही भावंडाचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंत उत्तरीय तपासणीसाठी युसुफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहे.

गुडीपाडव्याच्या आदल्या दिवशी अशी दुःखद घटना घडल्याने परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे. तीनही  भावंडं खेळत असतान घरी परत आली नसल्यामुळे चौधरी कुटुंबाने त्यांचा शोध घेतला असता खड्याच्या शेजारी तीनही मुलांचे कपडे आढळून आले. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आल्यानंतर तीनही मुलं बुडाल्याचे त्यांच्या लक्षात आले.