MNS : मी संजय राऊत यांना भेटून विनंती करणार की..सध्याच्या पक्षांतराच्या राजकारणात मनसेने मांडली एक वेगळी वैचारिक भूमिका
MNS : सध्या महाराष्ट्रच नाही, देशाच्या राजकारणात मोठी फाटाफूट सुरु आहे. भाजप देशव्यापी सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे सत्तेची फळ चाखण्यासाठी विरोधी पक्षातले आमदार, खासदार सहज सत्ताधारी पक्षात उड्या मारत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक वेगळी विचार करायला भाग पाडणारी वैचारिक भूमिका मांडली आहे.

नुकतेच उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले. याआधी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी फाटाफूट झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. दोन गट झाले. एक गट सत्ताधारी आघाडीत आणि दुसरा विरोधी पक्षात. महाराष्ट्राच्या राजकारणात आता पक्षांतर सर्रास होतं. त्यावर नियंत्रण असलं पाहिजे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी जनमत चाचणीचा पर्याच सुचवला आहे. “पक्षांतर हा मोठा विषय आहे. याला लोकमान्यता आहे का?. जनमत चाचणी ही जगभरात एक संकल्पना आहे. ज्या लोकांना पक्ष बदलायचा आहे, त्यांनी त्यांच्या मतदार संघात जनमत चाचणी घ्यावी” असं संदीप देशपांडे म्हणाले. “लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका असली पाहिजे असं लोकांना वाटतं. मात्र विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांमध्ये सहभागी व्हायला लागला तर सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवणार कोण?” असा रास्त सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.
“अमेरिकेत मिड टर्म पोल होतो. दोन वर्षांनी लोकांना विचारावं लागतं, काम आवडतं की नाही. लोक नाही म्हणाले तर अधिकारी कमी केले जातात. जगभरातील सगळ्यात मोठी लोकशाही भारतात आहे. जर त्या लोकप्रतिनिधीला जनतेने कौल दिला तर नीतिमत्ता ठरेल, नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावा. विरोधी पक्षाने अशासकीय विधेयक आणलं पाहिजे. निदान चर्चा तर घडेल संसदेत” असं संदीप देशपांडे म्हणाले. “समाजातील ज्येष्ठ, बुद्धिमत्ता असणारे आणि झेन झी यांनी पण ही चर्चा करणे गरजेचे आहे. लोकभावनेचा आदर करण्यासाठी टेकू देता येईल. मी संजय राऊत यांना भेटून विनंती करणार की हा मुद्दा संसदेत मांडा” असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. “संजय राऊत यांना विनंती करणार की जनमत चाचणी घ्या. सामान्य माणसाने केवळ पाच वर्षांतच मत व्यक्त करावं का, एरवी करायचं नाही का?. त्याला कोणतं व्यासपीठ उपलब्ध आहे का, हा निर्णय नाही पटला की पटला. मी बोलल्यावर उद्या होणार नाही पण समाजात एक चर्चा घडावी” असं संदीप देशपांडे म्हणाले.
जनतेला सगळं मान्य असेल तर प्रश्न नाही
“तुम्ही करा जनमत चाचणी. जनतेला सगळं मान्य असेल तर प्रश्न नाही. खासदार आणि आमदारांमध्ये जनमत चाचणी विरोधात गेली तर नैतिकता असावी. पक्षाच्या बद्दल मी बोलत नाही. मी सरसकट बोलत आहे. उद्या भाजपच्या खासदाराला वाटल की जे चाललं आहे ते बरोबर नाही, मला काँग्रेसमध्ये जायचय तर त्याने पण जनमत चाचणी घ्यावी” असं संदीप देशपांडे बोलले.
इच्छा असेल तर मार्ग निश्चित मिळेल
“कायद्यात तरतूद करणं गरजेचं आहे. बॅलेटवर करा जनमत चाचणी. सरकार आणि खासदार करणार नसतील तर एखादी न्यूट्रल एजन्सी नेमून त्यांना घ्यावी. कायद्याने अडचण नसावी, लोकांना काय वाटत ते समजून घ्यायला. मतदान घेणे परत हा वेगळा विषय आणि लोकांची भावना काय हे समजून घेणे वेगळा विषय. ब्रिटनने युरोपीय देशातून बाहेर पडायचं की नाही ते लोकांना विचारलं आणि ब्रेक्झिट केलं. इच्छा असेल तर मार्ग निश्चित मिळेल” असं संदीप देशपांडे म्हणाले.