महाराष्ट्रातील सरकार हे येड्याचं सरकार; काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात

सुशिक्षित बेरोजगार युवकांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण सरकारकडून केले जाते. त्याचाच परिणाम आज बघायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील सरकार हे येड्याचं सरकार; काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Aug 21, 2023 | 4:52 PM

भंडारा : तलाठी भरती प्रक्रियेमध्ये सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर ताटकळत बसावं लागलं. औरंगाबाद शहरातील पीएस महाविद्यालयात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊनचा फटका शेकडो विद्यार्थ्यांना बसला. सर्वर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांचे लॉगिन होऊ शकलं नाही. त्यामुळे तब्बल अर्धा ते पाऊण तास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर थांबावे लागले. तब्बल पाऊण तासानंतर सर्व्हर सुरळीत सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार हे ईडीचं नव्हे तर, येड्यांचं सरकार आहे. बेरोजगारांना नोकरी देण्यापेक्षा बेरोजगारांचे खिसे कापण्यावर त्यांचा जास्त जोर आहे. दोन हजार जागांसाठी 15 – 15 लाख अर्ज येतात. त्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये प्रवेश शुल्क आकारल्या जाते. अरबो रुपये जमा केले जात आहे.

सुशिक्षित बेरोजगारांचे शोषण

तलाठी परीक्षा घेणारी प्रायव्हेट कंपनी याचा सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा वाटा आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. या पद्धतीच्या कधी पेपर फूट तर, कधी सर्व्हर डाऊन दाखविले जातात. यातून सुशिक्षित बेरोजगार युवकांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण सरकारकडून केले जाते. त्याचाच परिणाम आज बघायला मिळत आहे. तरुणांच्या विरोधातील हे सरकार आहे. मुद्दाम हे येड्यांचं सरकार पाप करीत असल्याची घणाघाती टीका नाना पटोले यांनी तलाठी परीक्षेच्या सर्व्हर डाऊनबाबत बोलताना केली.

प्रतापराव जाधव यांना प्रत्युत्तर

काँग्रेस हायकमांडनं विजय वडेट्टीवार यांनी मोठी जबाबदारी दिली. ते आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडत आहेत. वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं काम करीत आहेत. हे दुखणं भाजपला आहे. त्यामुळेच या पद्धतीचं ते वक्तव्य करीत असल्याची टीका नाना पटोले यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर केली आहे. प्रतापराव जाधव यांनी काँग्रेसवर टिप्पणी करताना वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीनंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची टीका केली. त्यावर नाना पटोले हे बोलत होते.

भाजप हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. असं म्हणत, नाना पटोले यांनी कांदा निर्यातीवर लावलेल्या 40 टक्के वाढीबाबत भाजपवर टीका केली. शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात निघाला. त्याला विदेशातही मोठी मागणी आहे. मात्र, केंद्र सरकारनं निर्यातीवर शुल्क वाढवले. हा बोजा बसवून एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्याबाबत आम्ही केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करतो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनीही बसणार आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याचं स्पष्ट होत असल्याचं नाना पटोले यांनी वक्तव्य केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us