महाराष्ट्राला मोठा धोका, ‘या’ दहशतवादी संघटनेचं 20 जिल्ह्यात नेटवर्क, केंद्रीय गुप्तचर खात्याचा इशारा

मोठी बातमी समोर येत आहे. आता बांगलादेशी आणि रोहिंग्या रडारवर असून, केंद्रीय गुप्तचर खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्राला मोठा धोका, या दहशतवादी संघटनेचं 20 जिल्ह्यात नेटवर्क, केंद्रीय गुप्तचर खात्याचा इशारा
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Jan 22, 2025 | 4:34 PM

मोठी बातमी समोर येत आहे. आता बांगलादेशी आणि रोहिंग्या रडारवर असून, केंद्रीय गुप्तचर खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात बांगलादेशच्या जमात ए इस्लामी, या दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या स्लीपर सेलचं नेटवर्क राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर खात्यासह, राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. तपास यंत्रणा सक्रिय झाली असून, युद्धपातळीवर रोहिंग्या आणि बांगलादेशींचा शोध सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जवळपास वीस जिल्ह्यांमध्ये बनावट जन्म प्रमाणापत्र आणि दाखले वितरीत झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. राज्यात जवळपास दीड ते दोन लाख बांगलादेशी घुसखोर असू शकतात,असा तपास यंत्रणेचा अंदाज आहे. या घुसखोरांना मदत करणारे स्थानिक आणि प्रशासनातील अधिकारी देखील आता सरकारच्या रडारवर असणार आहेत. बांगलादेशातील सत्ता बदलानंतर पुन्हा एकदा जमात ए इस्लामी संघटना कार्यरत झाली असून, या दहशतवादी संघटनेचा भारताला मोठा धोका असल्याचं गुप्तचर विभागानं म्हटलं आहे.

दरम्यान  बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैध रीतीने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येणाऱ्या घुसखोरांविरोधात त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अन्य संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. माजी खासदार राहुल शेवाळे यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल घेत, केंद्रीय गृहमंत्रालयाने वरील निर्देश दिले आहेत. अभिनेता सैफ अली खानवर बांगलादेशी घुसखोरांकडून झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या आदेशाने घुसखोरांच्या विरोधातील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.

राहुल शेवाळे यांनी 28 नोव्हेंबर 2024 रोजी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या निवेदनात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ( TISS ) या संस्थेकडून घुसखोरांविषयी केलेल्या सर्वेक्षणाचा उल्लेख केला होता. शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, TISS ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईत बांगलादेशी आणि म्यानमारमधून आलेल्या घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडली असून गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्या उद्भवल्या आहेत. काही राजकारण्यांकडून अशा घुसखोरांचे ‘ वोट बँक ‘ म्हणून लांगूलचालन सुरू आहे. बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या या लोकांमुळे स्थानिकांच्या रोजगारावरही परिणाम होताना दिसत आहे, त्यानंतर आता रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Follow Us