
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आगामी काळात राज्यात सुमारे 15 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळात या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आता 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सरकारने गुड न्यूज दिली आहे. या उमेदवारांना आता आणखी संधी देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज्य सरकारने 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा संपलेल्या तरुणांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अशा उमेदवारांना विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे या उमेदवारांना आपले स्वप्न पूर्ण करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. गृह विभागाने 10 सप्टेंबर 2025 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. शेकडो तरुणांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
आधी कोरोना आणि नंतर इतर काही कारणांमुळे पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेले विद्यार्थी आणि विविध संघटनांनी वयोमर्यादा वाढवण्याची मागणी केली होती,त्यामुळे आता सरकारने अशा उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नुकतेच पोलीस दलातील 15 हजार 631 पदभरतीचा शासन निर्णय जारी केला आहे. पोलीस दलातील पदं शंभर टक्के भरण्यात येणार आहेत. या निर्णयाअंतर्गत आता जानेवारी 2024 पासूनची रिक्त पदं भरली जाणार आहेत. यात आता वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे.
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार आता पोलीस शिपाई पदासाठी 12 हजार 399 जागांची भरती होणार आहे. तर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण 234 जागा भरल्या जाणार आहेत. बॅण्ड्समन पदाच्या एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत. तर सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या एकूण 2 हजार 393 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कारागृह शिपाई 580 पदे अशी 15 हजार 631 पदे भरली जाणार आहेत.