मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला, अहिल्यानगरमध्ये वातावरण पेटलं
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या बड्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. जमावाने केलेल्या हल्ल्यामुळे अहिल्यानगरमध्ये वातावरण पेटलं आहे.

अहिल्यानगरमधून मोठी बातमी हाती आली आहे. अहिल्यानगरमध्ये भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगरमधील नेवासा येथे ही धक्कादायक घटना घडली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्षांवर जवळपास 100 हून अधिक जणांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. शेटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने अहिल्यानगरमधील वातावरण पेटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरमधील नेवासा येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषी शेटे यांच्यावर जमावाने हल्ला केला आहे. जमावाने त्यांच्या कारची देखील तोडफोड केली आहे. जमावातील काही जणांनी त्यांच्या हातावर चाकूने वार केल्याची माहिती आहे. ही संपूर्ण घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पोलिसांनी 90 ते 100 जणांवर रात्री गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय घडलं?
ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणा-या मार्गावरील अतिक्रमण काढण्याची ऋषी शेटे यांनी मागणी केली होती. याच रागातून फळविक्रेत्यांकडून ऋषी शेटेंना मारण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. नगरपंचायचे सीओ आणि पोलीसांवरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकासोबत वाद झाला. अतिक्रमण काढण्याची तक्रार करणारे ॠषी शेटे हे गणपती मंदिर परिसरातून जात असताना जमावाने हल्ला केला. पोलीसांनी जमावाचा प्रतिकार केल्याने ॠषी शेटे बचावले..आता घटनास्थळी पोलीसांकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कारवाईदरम्यान उपस्थितांचा गोंधळ
नेवासामध्ये नगरपंचायतीच्या पथकाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होती. या कारवाईचा काही फेरीवाल्यांनी तीव्र विरोध केला. नगरपंचायतीच्या कारवाईदरम्यान ऋषिकेश शेटे यांची कार पथकाच्या मागाहून जात होती. त्यामुळे फेरीवाल्यांच्या मनात गैरसमज पसरला. या गैरसमजातून काही नागरिक आक्रमक झाले. त्यांनी ऋषी शेटे यांच्या कारची तोडफोड केली. शेटे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून तक्रार नोंदवणे आणि पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. परिसरात शांतता ठेवून सहकार्य करावे. काही अडचण आल्यास तक्रार करावी. पोलिसांशी संपर्क साधावा, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केलं.